लातुरात पुन्हा पूर परिस्थिती !

लातुरात पुन्हा पूरस्थिती

लातूर – जिल्ह्यात पुन्हा पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. २८ ऑक्टोबरला सकाळपासून सतत पाऊस कोसळल्यामुळे लातूर जिल्ह्यातील नदीपात्रांत मोठ्या प्रमाणात पाणी आले असून धरणांतून विसर्ग चालू आहे. रेणापूर प्रकल्प (रेणा नदी) मध्ये दिवसाकाठी ४ दरवाजे उघडण्यात आले असून अनुमाने ४,९८७.५३ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. मांजरा धरण प्रकल्पातून अनुमाने १,७४७.१४  क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे. तावरजा मध्यम प्रकल्पामध्येसुद्धा १० से.मी. उघडलेले दरवाजे असून अनुमाने २३० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठावरील आणि पुरामुळे बाधित होऊ शकणार्‍या गावांतील नागरिकांना सावध रहाण्याचे आवाहन केले आहे.