Madhya Pradesh HC : जातीद्वेषावर नियंत्रण ठेवले नाही, तर १०० ते १५० वर्षांत हिंदूंचे अस्तित्व नष्ट होईल ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण

मध्यप्रदेश उच्च न्यायालय

जबलपूर (मध्यप्रदेश) – लोक स्वतःला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे संबोधतात. प्रत्येक जण त्यांची स्वतंत्र ओळख दर्शवतो. या टप्प्यावर जर अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवले नाही, तर १०० ते १५० वर्षांत स्वतःला हिंदु म्हणवणार्‍या लोकांचे अस्तित्व नष्ट होईल, असे निरीक्षण मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी नोंदवले.

जातीवरून अवमान करणार्‍यांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ लावण्याचा आदेश

राज्यातील दमोह जिल्ह्यात ११ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या घटनेची स्वतःहून नोंद घेत उच्च न्यायालयाने १४ ऑक्टोबर या दिवशी हे निरीक्षण नोंदवले. या घटनेत इतर मागासवर्गीय समुदायातील एका व्यक्तीचा उच्चवर्णीय ग्रामस्थांनी अपमान केला होता. त्यांनी पीडित व्यक्तीला कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे बनवलेला टीका करणारा एक व्हिडिओ पाठवल्याच्या आरोपाखाली एका उच्चवर्णीय व्यक्तीचे पाय धुण्यास भाग पाडले होते. न्यायालयाने पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांना व्हिडिओमध्ये दिसणार्‍या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचे निर्देश दिले.

प्रत्येक जण स्वतःच्या जातीच्या प्रदर्शनाविषयी अतिशय आक्रमक होत आहे !

उच्च न्यायालयाने म्हटले की, हे तेच राज्य आहे जिथे एका उच्चवर्णीय व्यक्तीने एका आदिवासी व्यक्तीच्या डोक्यावर लघुशंका केली होती. या विरोधातील संताप निवळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पीडित व्यक्तीचे पाय धुतले होते. जातींचे प्रदर्शन वाढत आहे. प्रत्येक समाज वारंवार आणि बिनधास्तपणे स्वतःच्या जातीची ओळख मिरवत आहे, ज्याचा संपूर्ण हिंदु धर्मावर वाईट परिणाम होत आहे. प्रत्येक जण स्वतःच्या जातीच्या प्रदर्शनाविषयी अतिशय आक्रमक होत आहे आणि विशिष्ट जातीशी संबंधित असल्याचा अभिमान दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाही. यामुळे जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये पीडित हे कमीत कमी साक्षर आणि आर्थिकदृष्ट्या सर्वांत गरीब आहेत. भारताच्या सरन्यायाधिशांवर बूट फेकल्याची घटना आणि हरियाणामध्ये वरिष्ठ अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी केलेली आत्महत्या या घटना देशात जातीशी संबंधित सूत्रांना महत्त्व मिळाल्याची उदाहरणे आहेत.

संपादकीय भूमिका

मुळात हिंदु धर्मामध्ये जाती नाहीत, तर वर्णाश्रमव्यवस्था आहे जी ईश्वरनिर्मित आहे. त्यामुळे जातपात दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शंकराचार्य, धर्माचार्य, संत यांनी पुढाकार घेतला पाहिजे !