Gorakhpur Cyber Scam : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली वृद्धाची ५ लाख रुपयांची फसवणूक

(‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे स्वतःची खोटी ओळख सांगून ऑनलाईन अटक करणे)

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि आतंकवादविरोधी पथक यांचे अधिकारी असल्याचे भासवून भामट्यांनी एका वृद्ध व्यक्तीची ५ लाख रुपयांची फसवणूक केली. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली २ दिवस पीडित वृद्धाला सतत देखरेखीखाली ठेवून आरोपींनी ही रक्कम उळळली.

आरोपींनी कशी रचली कथा ?

स्वतः राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा अधिकारी म्हणवणार्‍या एका व्यक्तीने धनुषधारी तिवारी यांच्या भ्रमणभाषवर १७ फेब्रुवारीला संपर्क करून त्यांच्या आधारकार्डाचा वापर करून जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्याशी संबंधित बँक खाते उघडल्याजे सांगितले. यासह त्याने तिवारी यांना चौकशीसाठी पुण्यातील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगितले. यावर तिवारी यांनी त्यांना तत्काळ पुण्यात जाणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर दुसर्‍या एका व्यक्तीने स्वतः गोरखपूर आतंकवादविरोधी पथकाचा अधिकारी असल्याचे भासवून तिवारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर व्हॉट्सॲप कॉलद्वारे सतत संपर्क ठेवण्यात आला. चौकशीच्या नावाखाली तिवारी दाम्पत्याला ‘इतर कुणाशीही संपर्क साधू नये आणि भ्रमणभाष सतत चालू ठेवावा’, अशी सूचना देत मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत ‘सुरक्षा रक्कम’ म्हणून ५ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले. भीतीपोटी तिवारी यांनी मुदत ठेव मोडून ही रक्कम आरोपींनी दिलेल्या खात्यात वर्ग केली.

पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारच्या शिक्क्यासारखी बनावट कागदपत्रे तिवारी यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍याच दिवशी त्यांचे सर्व भ्रमणभाष क्रमांक बंद लागल्यानंतर स्वतःची फसवणूक झाल्याचे तिवारी यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी ‘सायबर हेल्पलाईन’ क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवली. प्राथमिक चौकशीनंतर सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अन्वेषण करून कारवाई करणार ! – पोलीस अधीक्षक

पोलीस अधीक्षक (गुन्हे) सुधीर जैस्वाल यांनी सांगितले की, या प्रकरणातील बँक खाती, भ्रमणभाष क्रमांक आणि डिजिटल व्यवहार यांची पडताळणी चालू असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

देशात अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. असे कृत्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक बसवणारी कारवाई सरकार दोषींवर कधी करणार ?