TMC Split : तृणमूल काँग्रेसच्या २० लोकसभा खासदारांचा ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’मध्ये विलीनीकरणाचा निर्णय !

  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देणार पाठिंबा

  • ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेताना तृणमूलचे खासदार

कोलकाता – तृणमूल काँग्रेस पक्षातील २० लोकसभा खासदारांच्या गटाने ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (एन्.सी.पी.आय.) या नोंदणीकृत प्रादेशिक राजकीय पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. १४ जून या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर तृणमूलचे ज्येष्ठ खासदार आणि लोकसभेतील पक्षाचे माजी नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी या निर्णयाची घोषणा केली. या वेळी काकोली घोष दस्तीदार आणि शताब्दी रॉय यांच्यासह या गटातील इतर नेते उपस्थित होते. यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. या गटाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होण्याचाही निर्णय घेतला आहे.

१.  केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी बैठक घेतल्यानंतर या बंडखोर गटाने लोकसभेच्या अध्यक्षांची भेट घेतली.

२. अध्यक्षांशी झालेल्या बैठकीनंतर, काकोली घोष दस्तीदार यांनी गटाने स्वतंत्र बसण्याची विनंती केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, ‘२० खासदारांचा आमचा गट तृणमूल काँग्रेसच्या एकूण सदस्यसंख्येच्या (२८ खासदार) दोन-तृतीयांशपेक्षा मोठा आहे. आम्ही ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी’मध्ये विलीन होत आहोत. यापुढे आम्ही देशासाठी काम करू आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत सहकार्य करू.’

३. वर्ष २०२६ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूलचा मोठा पराभव झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

४. वैयक्तिकरित्या पक्ष पालटण्याऐवजी किंवा नवीन पक्ष स्थापन करण्याऐवजी, आपला गट (ज्यामध्ये दोन-तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य आहेत) अस्तित्वात असलेल्या नोंदणीकृत ‘एन्.सी.पी.आय.’ पक्षात विलीन करून, बंडखोरांनी हे सुनिश्चित केले आहे की, ही कृती केवळ ‘पक्ष-पालट’ (डिफेक्शन) नसून एक कायदेशीर ‘पक्ष विलीनीकरण’ ठरेल.