गड संवर्धन आणि पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा !

सातारा, १४ जून (वार्ता.) – स्थापत्यशास्त्राचा अनमोल ठेवा असणार्या माण तालुक्यातील महिमानगडाचे संवर्धन आणि संरक्षण यांचा मार्ग मोकळा झाला आहे. महिमानगड आता ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. यामुळे गड संवर्धन आणि स्थानिक पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे. याविषयीचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रालयातील उपसचिवांकडे गेला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने महिमानगडाला ‘राज्य संरक्षित
स्मारक’ घोषित करण्याची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल. यानंतर गडाच्या दुरुस्ती, संवर्धन आणि पुरातत्वीय जतनासाठी शासनाकडून विशेष उपाययोजना राबवण्याचा मार्ग मोकळा होईल.
शिवकालीन महिमानगडाची ऐतिहासिक ओळख देश-विदेशांत पोचून इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक स्तरावर पर्यटनाशी संबंधित रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील महत्त्वाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शासनाच्या या निर्णयाविषयी शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणारा महिमानगड आजही आपल्या प्राचीन वैभवाच्या खुणा जतन करून आहे. गडावरील तटबंदी, बुरूज, पाण्याची टाकी, तळे, तळघर तसेच गोमुखी पद्धतीचे बांधकाम यांसारखे स्थापत्य अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे आहेत; मात्र अधिकृत संरक्षण नसल्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनास अनेक अडचणी येत होत्या.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !