डॉ. तावडे यांना जामीन संमत करण्यात आला, याचा मला आनंद ! – अधिवक्त्या पुष्पा गनेडीवाला

अधिवक्त्या पुष्पा गनेडीवाला

कोल्हापूर – येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘सर्किट बेंच’कडून कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जामीन संमत करण्यात आला, याचा मला आनंद आहे. डॉ. तावडे हे कॉ. गोविंद पानसरे खटल्यातील एक संशयित असून त्यांना जवळपास ९ वर्षे कारागृहात रहावे लागले.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना वर्ष २०१८ मध्ये कोल्हापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन संमत केला होता; परंतु त्याच न्यायालयातील पुढील न्यायाधिशांनी ‘त्यांच्याविरुद्ध पुरेशी सामग्री उपलब्ध आहे’, या कारणावरून तो जामीन रहित केला. डॉ. तावडे यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन संमत केला.

मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नमूद केले की, सत्र न्यायालयाला स्वतःच्याच आदेशाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार नाही, तसेच सहआरोपी शरद कळसकर आणि अमोल काळे यांना समानतेच्या तत्त्वावर जामीन देण्यात आला होता. ते दोघेही ६-७ वर्षे कारागृहात होते. दीर्घकालीन कारावास आणि कटकारस्थानाविषयी ठोस पुरावे अपुरे असल्यामुळे डॉ. तावडे यांनाही जामीन संमत करण्यात आला.

सरकारी पक्षाच्या दाव्यांत तथ्य नाही !

या प्रकरणी युक्तीवाद करतांना माजी न्यायमूर्ती आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता पुष्पा गनेडीवाला म्हणाल्या, ‘‘या प्रकरणात वारंवार हे षड्यंत्र असल्याचा आणि डॉ. तावडे यांचा उल्लेख केला जातो; मात्र या प्रकरणात चालू असलेल्या अन्वेषणात फारसे नवीन काहीच समोर आलेले नाही. त्यामुळे सरकार पक्ष जे विविध दावे करत आहे, त्यांत तथ्य नाही.’’