‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती

अनुमती देतांना न्यायाधिशांनी घेतला ‘मनाच्या श्लोका’तील ‘जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ।।’, या श्लोकाचा संदर्भ !

मुंबई – अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या शीर्षकाचे श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’शी साधर्म्य असले, तरी त्याचा मूळ ‘मनाचे श्लोक’ ग्रंथाशी काहीही संबंध नाही’, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आणि चित्रपटाच्या निर्मात्यांच्या बाजूने निकाल दिला. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी ‘जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ।।’, या समर्थ रामदासस्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’मधील काही ओळींचा संदर्भ दिला.

‘मनाचे श्लोक’ हे हिंदूंसाठी पवित्र आहेत, तर ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे) वर आधारित असल्यामुळे त्यात व्यभिचार आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समर्थ रामदासस्वामी यांच्या शिकवणीचे चुकीचे चित्रण केल्यासारखे होईल’, अशी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देऊन आध्यात्मिक साहित्याचे नाव देणार्‍यांनी जनाची नाही, तर मनाची लाज तरी बाळगावी !