Manache Shlok Film Controversy : पुणे येथे ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचा खेळ बंद पाडला !

समर्थभक्तांच्या संघटित प्रयत्नांचा परिणाम

पुणे – येथील सिंहगड रोडवरील अभिरुची मॉल चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट समर्थभक्तांच्या विरोधानंतर बंद करण्यात आला. समर्थभक्तांनी सांगितले की, या चित्रपटात ‘विवाहबाह्य संबंध कसे ठेवायचे ?’, याविषयीचे चित्रण आहे; मात्र त्याला समर्थ रामदासस्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाचे नाव देण्यात आले आहे. हा आमच्या श्रद्धेचा अवमान आहे. त्यामुळे आरंभीपासूनच या चित्रपटाला आमचा तीव्र विरोध होता. या पार्श्वभूमीवर समर्थभक्तांनी अभिरुची मॉलमध्ये जाऊन थेट प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांनी चित्रपटातील कथानकाची माहिती दिल्यावर प्रेक्षकांनीही या चित्रपटाच्या विरोधात त्यांचा पाठिंबा दर्शवला. त्यानंतर चित्रपटगृहात कुणीही प्रेक्षक नसल्यामुळे प्रशासनाने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. ‘हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा कोणताही चित्रपट आम्ही चालू देणार नाही’, अशी चेतावणी समर्थभक्तांनी दिली.

संपादकीय भूमिका

हिंदु समाज जर संघटितपणे उभा राहिला, तर कुणाचेही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याचे धाडस होणार नाही. त्यामुळे प्रत्येक हिंदूने अशा प्रकारच्या सांस्कृतिक आक्रमणांविरुद्ध तात्काळ आणि संघटितपणे उभे रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे !