छत्रपती शिवराय शेवटच्या क्षणापर्यंत सर्व मातांचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध होते ! – पू. भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

सांगली, २८ सप्टेंबर (वार्ता.) – गंगामाता, जिजामाता, भारतमाता, गोमाता, भूमाता, तुळजाभवानी माता आणि जन्मदाती माता या सर्व समान आहेत. हा सनातन वैदिक हिंदु धर्मातील सिद्धांत आपण सर्व जण विसरलो; परंतु छत्रपती शिवराय यांनी याचा कधी विसर पडू दिला नाही. वयाच्या १६ व्या वर्षांपासूनच शेवटच्या श्वासापर्यंत या सर्व मातांचे रक्षण करण्यासाठी ते कटीबद्ध होते, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी २८ सप्टेंबर या दिवशी येथे श्री दुर्गामाता दौडीच्या ७ व्या दिवशी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना केले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले की, १२ मावळ प्रांतात न्यायनिवाडा, शासन- प्रशासन व्यवस्था पहातांना शहाजीराजे यांच्या आदेशानुसार दादोजी कोंडदेव यांनी छत्रपती शिवरायांना समवेत घेऊनच पदोपदी हे सर्व केले. रांझाच्या पाटील याने अत्याचार केल्याचे गार्‍हाणे लाल महालावर छत्रपतींच्या समोर आल्यानंतर छत्रपतींनी तात्काळ पाटील याला अटक करून आणण्याचे आदेश दिले. पाटील याचा चौरंग केला. स्त्रियांवर अत्याचार करणार्‍यांची गय केली जाणार नाही, हे प्रत्यक्ष दाखवून दिले. आजच्या काळात मात्र असे होतांना दिसत नाही. स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हे सहन केले जाणार नाही. छत्रपती शिवरायांनी दिलेला हा सिद्धांत आणि मंत्र लक्षात ठेवून सर्व धारकर्‍यांनी आपल्या माय, भगिनी यांच्यावर अत्याचार होत असल्यास त्याला पायबंद घालावा. सप्तमातांच्या रक्षणासाठी जो सतत सिद्ध आणि कृतीशील असतो, तोच खरा हिंदु आहे, हे लक्षात घेऊन कृतीशील होऊया.