महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो ! – उद्धव ठाकरे

स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचे प्रकरण

उद्धव ठाकरे व राज ठाकरे

मुंबई – येथील शिवाजी पार्कमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न १६ सप्टेंबरच्या सायंकाळी करण्यात आला. हा प्रकार कुणी केला, याचे अन्वेषण चालू आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पुतळ्याची पहाणी केल्यावर ते म्हणाले, ‘‘हा प्रकार अत्यंत निंदनीय असून याद्वारे महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो. आमच्या भावना अधिक तीव्र आहेत. आम्ही सगळ्यांना शांत रहाण्यास सांगितले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.’’

‘स्वत:च्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटणार्‍या लोकांनी हे कृत्य केले असेल. बिहारमध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान झाला; म्हणून बिहार बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला, त्याप्रमाणेच हा सर्व प्रकार करून महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो’, असेही ते म्हणाले.

२४ तासांत आरोपींना शोधा ! – राज ठाकरे

या प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. त्यांनी पोलिसांना विचारले, ‘‘सीसीटीव्ही चालू आहेत का ? सगळे सीसीटीव्ही चित्रण पडताळा आणि २४ तासांत आरोपींना शोधून काढा.’’