भारत-पाक क्रिकेट सामन्याला विरोध करण्याचा ठाकरे गटाला नैतिक अधिकार नाही ! – नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्ते आणि खासदार

नरेश म्हस्के

ठाणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – अबूधाबी येथे १४ सप्टेंबरला होणार्‍या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाने विरोध केला आहे. मुळात आशिया चषकातील हा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वीही तणावाच्या वेळी काँग्रेस सत्तेत असतांना २ देशांमध्ये क्रिकेटचे सामने खेळले गेले आहेत; मात्र प्रतिदिन पाकिस्तानचे गोडवे गात काँग्रेसची भूमिका मांडणार्‍या आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडणार्‍या ठाकरे गटाला या सामन्याला विरोध करण्याचा नैतिक अधिकार नाही. ‘शेंदूर’ उडालेल्या दगडांनी ‘सिंदूर’ची काळजी करू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या १४ सप्टेंबरला करण्यात येणार्‍या आंदोलनावर पत्रकार परिषदेत टीका केली.