येरळा नदीपात्राबाहेर आलेल्या श्री गणेशमूर्तींचे पुन्हा नदीत केले विसर्जन !

निमणी (जिल्हा सांगली) येथील विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची आदर्श कृती !

पात्राबाहेर आलेल्या श्री गणेशमूर्तींचे पुन्हा नदीत विसर्जन करतांना विद्यानिकेतन हायस्कूलचे विद्यार्थी आणि सनातनचे साधक

तासगाव, १० सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सव काळात तालुक्यातील निमणी येथील येरळा नदीत भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विर्सजन केल्यानंतर पाणी न्यून झाल्यावर या मूर्ती नदीच्या पात्राबाहेर उघड्यावर राहिल्या होत्या, तसेच त्या ठिकाणी निर्माल्यही अस्ताव्यस्त पडलेले होते.

येरळा नदीत निर्माल्य संकलित करतांना विद्यानिकेतन निमणी हायस्कूलचे विद्यार्थी आणि सनातनचे साधक

( वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक )

ही माहिती समजल्यानंतर ‘पंचक्रोशी विद्यानिकेतन निमणी हास्यकूल’चे विद्यार्थी आणि सनातन संस्थेचे साधक सर्वश्री शंकर राजमाने, दीपक घोडके, विशाल सत्यवान पाटील यांनी नदीपात्राबाहेर आलेल्या मूर्ती एकत्रित करून त्या मूर्ती पुन्हा नदीच्या वहात्या पाण्यात विसर्जन केल्या, तसेच त्यांनी निर्माल्य, प्लास्टिकच्या पिशव्या आणि हार गोळा करून नदीपात्राबाहेर एकत्रित करून त्याचा ढीग केला. (नदीपात्राबाहेर आलेल्या श्री गणेशमूर्तींचे पुन्हा नदीच्या वहात्या पाण्यात विसर्जन करणार्‍या विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन ! यातून इतर संघटना, विद्यार्थी यांनी बोध घेऊन असा उपक्रम राबवून होणारे श्री गणेशाचे विडंबन थांबवावे ! – संपादक)