Gomata Sankalp Yatra : जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी यांची बिहारमध्ये ‘गोमाता संकल्प यात्रा !’

‘मतदानाचा अधिकार धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी वापरला जावा’, असा संदेश देणार

वासराला कुरवाळतांना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद

वाराणसी – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी हे बिहारमध्ये ‘गोमाता संकल्प यात्रा’ काढणार आहेत. ही यात्रा १२ सप्टेंबर २०२५ या दिवशी वाराणसीहून निघून बिहारमधील सीतामढी, मधुबनी, सुपाऊल, अरारिया, किशनगंज, पूर्णिया, भागलपूर, गया, औरंगाबाद, रोहतास, भोजपूर, सारण, सिवान, गोपालगंज, चंपारण, दरभंगा, मुझफ्फरपूर, खगड़िया, मुंगेर, नालंदा इत्यादी जवळजवळ सर्व प्रमुख जिल्ह्यांतून जाणार आहे. या यात्रेद्वारे ‘मतदानाचा अधिकार केवळ वैयक्तिक सोयीसाठी नव्हे, तर धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी वापरला जावा’, असा संदेश दिला जाणार आहे.

धर्म आणि राजकारण यांचा वैदिक संगम !

या यात्रेविषयी माहिती देतांना शंकराचार्य म्हणाले की, आज राजकारण हे केवळ सत्ताप्राप्तीचे साधन बनले आहे, त्यात राष्ट्राचा आत्मा किंवा समाजाची आध्यात्मिक जाणीव प्रतिबिंबित होत नाही. ही यात्रा आपल्याला आठवण करून देते की, धार्मिक राजकारणाविना देश कधीही मजबूत होऊ शकत नाही. भारतीय संस्कृतीत ‘राष्ट्रमाता’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोमातेला वाचवण्याचा संकल्प केल्याविना राजकारण केवळ पोकळ व्यवस्थाच राहील.

गोमाता ही ‘राष्ट्रमाता’ !

भारतीय जीवनात गोमाता ही केवळ एक प्राणी नाही, तर संपूर्ण सृष्टीच्या पोषणाचे प्रतीक आहे. वेदांमध्ये गोमातेला ‘अघन्या’ म्हटले गेले आहे; म्हणजे ज्याची कधीही हत्या केली जाऊ नये. आज जेव्हा आधुनिकतेच्या वादळाने संस्कृती उपटून टाकण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा ही यात्रा ‘गाय ही राष्ट्रमाता आहे’, असे घोषित करते. ही केवळ गोरक्षणाची मोहीम नाही, तर धर्मराज्याच्या पुनर्स्थापनेची पूर्वसिद्धता आहे. ‘गोमाता संकल्प यात्रा’ हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही, तर राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचे आवाहन आहे. ही यात्रा आपल्याला आठवण करून देते की, भारताचा आत्मा धर्मात रहातो आणि धर्माचा आधार ‘गोमाता’ आहे. जर देशाला मजबूत, स्वावलंबी आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून पुनरुज्जीवित करायचे असेल, तर गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा लागेल.