कोकण रेल्वेने मडुरा येथे शेतकर्‍याच्या भूमीत अतिक्रमण करून रस्ता बनवला

  • अतिक्रमण केल्याचे कागदोपत्री सिद्ध झाल्यावर अधिकार्‍यांची सामंजस्याची भूमिका

  • वापरलेल्या भूमीचा तात्काळ मोबदला द्या, अन्यथा आंदोलनाची शेतकर्‍याची चेतावणी

सावंतवाडी – कोकण रेल्वेच्या मडुरे रेल्वेस्थानकासाठी संपादित केलेल्या भूमीपेक्षा अधिक भूमी कोकण रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण करून वापरली जात आहे. हे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीकडे प्रारंभी दुर्लक्ष करून आडमुठे धोरण अवलंबणार्‍या कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या खासगी भूमीवर अतिक्रमण केल्याचे भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीत सिद्ध झाल्यानंतर नरमाईची भूमिका घेऊन सामंजस्याने या प्रकरणी तोडगा काढण्याचे मान्य केले. येथे आलेले कोकण रेल्वेचे वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता रवींद्र पाटील यांना संतप्त शेतकर्‍यांनी खडसावले, तसेच यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी शेतकर्‍यांनी दिली.

या प्रकरणाचा घटनाक्रम

१. मडुरे रेल्वेस्थानकासाठी वर्ष १९९१ मध्ये शेतकर्‍यांची भूमी संपादित करण्यात आली होती; मात्र कोकण रेल्वेने मूळ सीमेच्या बाहेर जाऊन शेतकरी प्रकाश वालावलकर यांच्या मालकी हक्काच्या भूमीवर अतिक्रमण करून रस्ता बनवला.

२. याविषयी त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार केली; मात्र त्याकडे कोकण रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे वालावलकर यांनी भूमी अभिलेख विभागाकडे रितसर अर्ज करून मोजणीची मागणी केली.

३. त्यानुसार भूमीची मोजणी केल्यावर कोकण रेल्वेने ठरलेल्या सीमेच्या बाहेर जाऊन ३९ गुंठे भूमीवर अतिक्रमण करून रस्ता बनवला असल्याचे दिसून आले. ही भूमी परत देण्यास कोकण रेल्वे प्रशासन टाळाटाळ करत असल्याने शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी उपोषणाची चेतावणी दिली होती.

४. या पार्श्‍वभूमीवर अभियंता पाटील घटनास्थळी पहाणी करण्यासाठी आले असता त्यांना स्थानिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. त्यांनी या चुकीचे खापर भूमी अभिलेख विभागावर फोडले; मात्र भूमी तपासणीत रेल्वे प्रशासनाची चूक असल्याचे लक्षात येताच त्यांनी सामंजस्याने तोडगा काढण्याचे मान्य केले.

५. कोकण रेल्वेने भूमीवरील अतिक्रमण काढून वापरलेल्या भूमीचा मोबदला तात्काळ देण्याविषयी ठोस कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे आणि शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी दिली आहे.