राळेगाव (जिल्हा यवतमाळ) येथील श्री शितलामाता मंदिर परिसरातील मांसविक्रीची २६ अवैध दुकाने प्रशासनाने हटवली !

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मागणीला यश

जेसीबीद्वारे हटवण्यात येत असलेले अवैध दुकाने

राळेगाव (जिल्हा यवतमाळ) – शहरात साधारणतः १०० वर्षांपूर्वीचे असलेले श्री शितलामाता मंदिर आहे. लोकांची मंदिरातील देवीवर श्रद्धा असल्याने ग्रामदेवता म्हणूनही हे मंदिर प्रसिद्ध आहे; परंतु गेल्या १० ते १५ वर्षांपासून मंदिर परिसरामध्ये अवैधरित्या अतिक्रमण करून मांस-मटण विक्रीची दुकाने उभारण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसराला मटणाच्या बाजाराचे स्वरूप आले होते. तेथे येणार्‍या दुर्गंधामुळे भाविकांना त्याचा प्रचंड मानसिक त्रास होत असे.

मंदिर परिसर मांस-मद्य मुक्त करण्याची मागणी राळेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या निवेदनाची नोंद समयमर्यादेत घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानुसार नगरपंचायत, महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे.

या प्रसंगी राळेगाव येथील उपविभागीय अधिकारी श्री. सुधीर पाटील, मुख्याधिकारी श्री. गिरीष पारेकर, पोलीस निरीक्षक यांच्यासह प्रशासनाचे अन्य अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आतापर्यंत मंदिर परिसरातील अवैध मांसविक्रीची २६ दुकाने हटवण्यात आली आहेत, तसेच मंदिर परिसरातील हे अतिक्रमण काढण्यासाठी पुढील कारवाई प्रशासनाकडून चालू आहे.

१. या वेळी काही मांस विक्रेत्यांनी दुकाने हटवण्यास आक्षेप घेत न्यायालयाकडून स्थगन आदेश मिळवला आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी २ सप्टेंबरला होईल.

२. अतिक्रमण हटवण्यासंदर्भात  ४ ऑगस्टला प्रशासनाकडून मंदिर परिसरात मांसविक्री करणार्‍या दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या.

३. काही मांस विक्रेत्यांनी आक्षेप घेतल्याने स्थानिक न्यायालयाने नगरपंचायत, राळेगाव यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्यामुळे ११ ऑगस्टला होणारी मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई प्रशासनाने तात्पुरती थांबवली होती.

संपादकीय भूमिका

  • १० वर्षांपासून मंदिर परिसरात मांस-मटण विक्रीची अवैध दुकाने उभी राहिली, हे प्रशासनाला दिसले नाही का ? कि त्यांचेही याला पाठबळ होते ?
  • यामध्ये सहभागी असणार्‍या उत्तरदायींवर धर्मद्रोह केल्याप्रकरणी कारवाई व्हायला हवी !  
  • मंदिर परिसरात मांस-मटण विक्री होते, याला हिंदू धर्मशिक्षित नाहीत, हेच कारणीभूत !