देशविरोधी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर ‘मकोकां’तर्गत कारवाई करावी ! – हणमंतराव पवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

    पत्रकार परिषदेत (डावीकडून) सर्वश्री सचिन पवार, श्री. विनायक माईणकर, श्री. हणमंतराव पवार (बोलतांना), श्री. अविनाशबापू सावंत, श्री. अंकुश गोडसे

सांगली, २९ ऑगस्ट (वार्ता.) – भाकडगायी आणि गोरक्षक यांच्याविषयी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख अन् भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे देश आणि धर्मद्रोही आमदार इद्रिस नायकवडी यांनी ‘गोरक्षणाच्या नावावर समाजविघातक कृत्य करणार्‍यांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे; मात्र मुळात इद्रिस नायकवडी यांनी अनधिकृतपणे पशूवधगृह चालू केले असून तेथे सर्रासपणे गोहत्या चालू आहेत, तसेच त्यांनी महापालिकेच्या सभेत ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार दिला होता. त्यामुळे आमदार इद्रिस नायकवाडी हे कट्टर इस्लामिक असल्याने त्यांच्यावर ‘मकोका’अंतर्गत प्रथम कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. हणमंतराव पवार यांनी येथे केली. येथील गावभागातील हरिदास भवन येथे २९ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गाय ही आईसमान आहे ! – अविनाश बापू सावंत

गाय भाकड झाली; म्हणून तिला पशूवधगृहात पाठवणे अयोग्य आहे; कारण या भाकड गायींपासून खतांसाठी लागणारे शेण आणि गोअर्क मिळते. जसे आई-वडील वयस्कर झाल्यावर आपण त्यांना सोडत नाही, त्यांचे पालनपोषण करतो, त्याच पद्धतीने ज्या गायींमुळे आर्थिक लाभ होतो, त्यामुळे ती गाय भाकड झाली; म्हणून तिला पशूवधगृहात सोडून देणे चुकीचे आहे. भाकड गायींचे पालनपोषण केले जाते; कारण गाय ही आईसमान आहे. भाकड गायींच्या संगोपनाविषयी शासनाने धोरण ठरवावे, अशी मागणी अविनाश सावंत यांनी केली.

राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार गोरक्षक कार्य करतात ! – अंकुश गोडसे, गोरक्षक

मी गेल्या १५-२० वर्षांपासून गोशाळा चालवतो. गोरक्षकांनी चोरून वाहतूक करणार्‍या गायी पकडल्यानंतर प्रथम पोलिसांना याची माहिती दिली जाते. पोलीस येईपर्यंत ते गायींचे संरक्षण करतात. राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत, त्यानुसार गोरक्षक कार्य करत आहेत.

श्री. हणमंतराव पवार पुढे म्हणाले की,

१. गोरक्षकाविषयी काही राजकीय नेते वक्तव्य करत आहेत; मात्र आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने कोणत्याही पक्षाचे लेबल लावलेले नाही.

२. गोरक्षक घरांवर तुळशीपत्र ठेवून गायींच्या रक्षणाचे कार्य करत आहेत. आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांविषयी अपशब्द वापरले आहेत; मात्र गोरक्षकांचा त्याच्याशी काहीच संबंध नाही.

३. राज्यात इद्रिस नायकवडीसारखे लोक आमदार होणे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. त्यांनी अनधिकृतपणे चालू केलेले पशूवधगृह बंद करण्याचा, तसेच त्यांची आमदारकी रहित होण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जातील.

४. गोरक्षकांनी आतापर्यंत एकातरी गायीची पशूवधगृहात विक्री केलेली आहे, असे एकतरी उदाहरण आरोप करणार्‍यांनी दाखवावे. आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या पशूवधगृहात कोणत्या जनावरांची कत्तल केली जाते, याची पडताळणी केली पाहिजे.

५. त्यांचे वक्तव्य म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत. आम्ही सदैव गोरक्षकांच्या पाठीशी उभे आहोत. ‘फर्जी’ म्हणजे ‘बनावट’ गोरक्षकांविषयी आरोप केले जात आहेत; मात्र बनावट गोरक्षकांची नावे घोषित करावी. त्यांची नावे का सांगितली जात नाहीत ? नावे सांगितल्यावर त्यांना आमच्या पद्धतीने उत्तर देऊ.

आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांवर काय आरोप केला ?

गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठे जाळे निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांच्या गाड्या अडवल्या जात आहेत. चालक आणि शेतकरी यांना मारले जात आहे. गोरक्षकांची व्यावसायिक कार्यालये आहेत. गोरक्षकांचा शेतकर्‍यांना त्रास होत आहे. सरकारने यात लक्ष घालून गोरक्षकांवर कारवाई न केल्यास पोलीस ठाण्यासमोर जनावरांच्या छावण्या उभ्या करू.

आमदार इद्रिस नायकवडी यांनी गोरक्षकांवर काय आरोप केला ?

महाराष्ट्रात गोरक्षकांच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढत आहेत. गोरक्षणाच्या तोडपाणी चालू असून त्यामध्ये पोलीसही सहभागी असल्यामुळे महाराष्ट्र बिहारप्रमाणे होण्याच्या मार्गावर आहे. शेतकर्‍यांना लुटण्याचा गोरक्षकांचा हा नवीन उद्योग राज्यात चालू झाला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हा विषय नक्की मांडणार आहे. गोरक्षकाच्या नावाखाली मनमानी आणि दादागिरी यांमुळे राज्याची प्रतिमा डागाळत आहे. पुणे येथे गोरक्षकांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्याविषयी गैरवर्तनाचा नायकवडी यांनी निषेध व्यक्त केला.

संपादकीय भूमिका

आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या गोरक्षकांविषयीच्या वक्तव्याचा निषेध !