‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ उपक्रमामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढण्यास साहाय्य ! – एम्.एन्. पाटील, निवृत्त लष्करी अधिकारी

दीपप्रज्वलनप्रसंगी उपस्थित विविध मान्यवर !

कोल्हापूर, ७ ऑगस्ट (वार्ता.) : ‘श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ हा उपक्रम गेली २६ वर्षे चालू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सीमेवर ज्या राख्या पाठवल्या जातात, त्यातून सैनिकांचे मनोधैर्य वाढण्यास साहाय्य होते, असे गौरवोद्गार निवृत्त लष्करी अधिकारी एम्.एन्. पाटील यांनी काढले. ‘श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ या उपक्रमाचे राजर्षी शाहू स्मारक येथे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. ५० हून अधिक शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. या उपक्रमातून २ लाखांहून अधिक राख्या संकलित झाल्या असून त्या ‘मराठा बटालियन’च्या माध्यमातून सीमेवर पाठवण्यात येणार आहेत.

‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ उपक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना श्री. किशोर घाटगे, तसेच अन्य मान्यवर

या प्रसंगी ‘श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘सीमेवरील सैनिकांसाठी राख्या पोचवण्यासाठी ट्रस्ट एक माध्यम आहे. मुलांप्रमाणे युवतींचीही सैन्यात जाण्यासाठी संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी कोल्हापूर शहरात ‘छत्रपती ताराराणी’च्या नावाने सैन्य महाविद्यालय चालू व्हायला हवे.’’ या प्रसंगी वीरमाता लक्ष्मीबाई पाटील, सुभेदार संजय पाटील, माजी लष्कर अधिकारी चंद्राहार पाटील, ‘श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट’चे श्री. राजेंद्र मकोटे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

प्रातिनिधिक स्वरूपात सैनिकांना राखी बांधतांना कु. सिद्धीकी साळेखे

या कार्यक्रमासाठी सौ. यशश्री घाटगे, सुनीता मेंगाणे, सर्वश्री कमलाकर किलकिले, महेश कामत, प्रशांत बरगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी बियांपासून सिद्ध केलेली १० फूट राखी सुपूर्द करण्यात आली.

विशेष

१. कु. सिद्धीकी साळेखे या शालेय विद्यार्थिनीने तिला वाढदिवसाच्या प्रसंगी, तसेच वर्षभर साठवलेल्या पैशांतून ट्रस्टला १ सहस्र राख्या दिल्या. कु. सिद्धीकी हिच्या हस्ते सैनिकांना पहिली राखी बांधण्यात आली.

२. या कार्यक्रमात छत्रपती शाहू विद्यालय, कर्मवीर इंग्लिश स्कूल यांसह शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने देशभक्तीचा आविष्कार झाला. देशप्रेम वृद्धींगत करणार्‍या या ‘शिवाई ग्रुप’च्या लहान मुलांनी सादर केलेल्या एका विशेष गीताने उपस्थितांची मने जिंकली.