महाराष्ट्र शासनाने १ मासात गोमातेविषयीची आचारसंहिता घोषित करावी ! – Swami Avimukteshwaranand

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद

मुंबई – महाराष्ट्र शासनाने गोमातेला ‘राज्यमाते’चा दर्जा दिला आहे; मात्र अद्याप त्याविषयीचा राजशिष्टाचार घोषित केलेला नाही. राजशिष्टाचार घोषित केला जात नाही, तोपर्यंत गोमातेला राज्यमातेचा दर्जा केवळ कागदावरच राहील. महाराष्ट्र ‘शासनाने १ महिन्याच्या आत राज्यमातेविषयी राजशिष्टाचार आणि गोमाता आचारसंहिता घोषित करावी, असे आवाहन ज्योतिषपिठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी ३ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

चातुर्मासाच्या निमित्ताने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुंबईतील बोरीवली येथे २ दिवसीय ‘गो संसदे’चे आयोजन केले आहे. या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील मागणी केली. गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी भारतीय संसदेला समांतर अशी ‘गो संसद’ काम करेल. याद्वारे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक ‘रामा गोधाम’ स्थापन केले जाईल. प्रत्येक रामा गोधाममध्ये १०८ गोमाता असतील. रामा गोधाममध्ये गोमाता प्रसन्नपणे विहार करतील. त्या दुधासह आशीर्वादही देतील. रामा गोधाम राष्ट्राच्या उन्नतीचे द्योतक ठरतील. यामुळे सनातन धर्म पुन्हा स्थिरता प्राप्त करू शकेल. महाराष्ट्रातही विविध भागांमध्ये रामा गोधाम प्रकल्प चालू होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात ४ सहस्र १२३ रामा गोधाम स्थापन करण्यात येणार आहेत, असे या वेळी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

गोमातेच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत असतांना गोतस्करी थांबण्यासाठीही सरकारने ठोस मोहीम राबवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !