Sambhaji Brigade : ‘संभाजी ब्रिगेड’ने नावात पालट न केल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल !

‘शिवधर्म फाऊंडेशन’चे संस्थापक दीपक काटे यांची चेतावणी

‘शिवधर्म फाऊंडेशन’चे संस्थापक दीपक काटे

ठाणे, ३० जुलै (वार्ता.) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. त्यांचे बलीदान, त्यांचा धर्माभिमान, त्यांची निष्ठा, यांमुळे आज आम्ही अभिमानाने ‘मराठा’ म्हणून उभे आहोत. महाराजांचे एकेरी नाव उच्चारणे, हा आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरच महाराजांचा सन्मान करत असेल, तर तिने तिच्या नावात पालट करून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ असे करावे, अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होईल, अशी चेतावणी ‘शिवधर्म फाऊंडेशन’चे संस्थापक दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडला दिली. येथे २९ जुलैला आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेत दीपक काटे बोलत होते.

‘महापुरुषांचे नाव जपणे, हे आपल्या प्रत्येकाचे दायित्व आहे; पण ब्रिगेडचे पदाधिकारी याकडे राजकीय लाभातून बघत आहेत’, असा आरोप काटे यांनी केला. अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड जात असतांना दीपक काटे आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना अडवले. त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या चेहर्‍याला काळे फासले. त्यानंतर आता पुन्हा एकदा काटे यांनी संभाजी ब्रिगेडला चेतावणी दिली आहे.