Himachal Heavy Rains : उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे हाहा:कार : हिमाचल प्रदेशात १०६ जणांचा मृत्यू !

अमरनाथ यात्रा दिवसभरासाठी स्थगित

नवी देहली – गेल्या महिन्याभरापासून देशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. डोंगराळ प्रदेश असलेल्या एकट्या हिमाचल प्रदेशात १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे ढगफुटीसारख्या घटनांमुळे ८०० कोटी रुपयांहून अधिकच्या सरकारी आणि खासगी मालमत्तेची हानी झाली आहे.

देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील दु:स्थिती

गेल्या एका आठवड्यापासून देहली, तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्., म्हणजेच नॅशनल कॅपिटल रिजन) येथे मुसळधार पाऊस चालू आहे. खराब हवामानामुळे १६ जुलैला देहली विमानतळावर उतरणार्‍या ६ विमानांचे उड्डाण वळवावे लागले.

आसाममध्ये भूस्खलन

आसाममधील दिमाहासाओ येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाच्या वेळी भूस्खलन झाले. यात २ जण ठार, तर ५ जण घायाळ झाले.

बिहारमध्ये विजा कोसळल्या

राज्यातील नालंदा जिल्ह्यात अनेक सखल भागात पूरस्थिती आहे. येथील फाल्गु नदीची पाण्याची पातळी सतत वाढत आहे. केवळ १६ जुलैला विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून २० जण ठार झाले.

मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्राही खोळंबली !

जम्मू-काश्मीर राज्यात मुसळधार पावसाची चेतावणी दिल्याने अमरनाथ यात्रा एका दिवसासाठी थांबवण्यात आली आहे. येथे संततधार चालू आहे. १७ जुलैला दोन्ही मार्गांवर कोणतीही हालचाल करण्यास अनुमती देण्यात आलेली नाही. काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी सांगितले की, हवामान परिस्थितीनुसार १८ जुलैपासून यात्रा पुन्हा चालू होईल. आतापर्यंत २ लाख ४७ सहस्र यात्रेकरूंनी पवित्र गुहेला भेट दिली आहे.