सरकारी खात्यांनी खाद्यपदार्थांमधील तेल आणि साखर यांचे प्रमाण स्पष्ट करणारे फलक लावावेत ! – Ministry of Health

निरोगी जीवनशैलीविषयी जागृती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

नवी देहली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व मंत्रालये, विभाग आणि स्वायत्त संस्था यांना आवाहन केले आहे की, प्रतिदिन खाण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांमध्ये तेल आणि साखर यांचे प्रमाण दर्शवणारे ‘तेल आणि साखर फलक’ कार्यालयांमध्ये लावावेत. यामुळे निरोगी जीवनशैलीला चालना मिळेल आणि लठ्ठपणा किंवा अन्य आजारांपासून संरक्षण करता येईल.

१. मंत्रालयाने लठ्ठपणाच्या संदर्भात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व अधिकृत स्टेशनरी (लेटरहेड, लिफाफे, नोटपॅड, फोल्डर्स) यांवर आरोग्यविषयक संदेश छापण्याचे आवाहन केले आहे.

२. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारतामध्ये प्रौढ आणि लहान मुले यांच्यामध्ये लठ्ठपणा वेगाने वाढत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार शहरी भागातील प्रत्येक पाचपैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहे.

३. वर्ष २०२५ मध्ये प्रकाशित ‘लॅन्सेट जीबीडी २०२१ ओबेसिटी फोरकास्ट स्टडी’नुसार वर्ष २०२१ मध्ये भारतात १८ कोटी प्रौढ लोक लठ्ठ होते, जे वर्ष २०५० पर्यंत ही संख्या ४४ कोटी ९० लाखांवर पोचेल. यामुळे भारत लठ्ठ लोकांच्या संख्येत जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश ठरेल.

४. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि काही प्रकारचा कर्करोग यांचा धोका वाढतो. तसेच मानसिक आरोग्य, शरिराची हालचाल, जीवनशैली आणि उत्पादकता यांवरही परिणाम करतो.

५. सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांतील सार्वजनिक परिसरात (उदा. कँटीन, लॉबी, मिटिंग रूम्स) तेल आणि साखर यांच्या वापरांवर लक्ष वेधणारे डिजिटल फलक लावावेत, असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

६. लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजार यांच्याशी लढण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार पुरेसा नाही, तर जनजागृती आणि सवयींत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे केंद्र सरकारने अधोरेखित केले आहे.