‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये विजयी झाल्याचा प्रचार जगात होण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची ! – एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत

विश्व संवाद केंद्राच्या देवर्षि नारद पुरस्कारांचे थाटात वितरण

मार्गदर्शन करतांना एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत

रत्नागिरी – ‘ऑपरेशन सिंदूर’ ही युद्धाची झलक आहे. यातून आपण काय शिकलोे, हे महत्त्वाचे आहे. आधुनिक आणि पालटत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने आत्मनिर्भर झाले पाहिजे, तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री हे पद योग्य व्यक्तीला दिले पाहिजे, जेणेकरून सैनिकी कारवाई करण्यात यश मिळेल. अर्थात् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार धडाडीचे निर्णय घेत आहे. पाककडून आतंकवादी आक्रमण झाले, तर तो एक युद्धाचा भाग समजला जाणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपण विजयी झाल्याचा जगात प्रचार केला पाहिजे. यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत  यांनी केले.

मुंबईच्या विश्व संवाद केंद्राच्या वतीने देवर्षि नारद पत्रकारिता सन्मान २०२५ पुरस्काराचे वितरण येथील रा.भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख अभिजीत हरकरे, पुरस्कार समितीचे संयोजक डॉ. निशीथ भांडारकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक दत्ताजी सोलकर उपस्थित होते.

वरिष्ठ पत्रकार अरविंद कोकजे (रत्नागिरी), उल्लेखनीय कार्याबद्दल प्रिंट मिडियातील श्रीराम पुरोहित (कर्जत), इलेक्ट्रॉनिक मिडियातील विजय गावकर (सिंधुदुर्ग) आणि सोशल मिडियासाठी संदेश फडकले यांना हा पुरस्कार देण्यात आला.

हेमंत भागवत पुढे म्हणाले की, रणनितीच्या दृष्टीने चर्चा आवश्यक आहे. युद्धाकडे भावनेच्या दृष्टीने न बघता अधिक डोळसपणे बघणे आवश्यक आहे. पाकिस्तानला ज्या प्रकारे चीनने साहाय्य केले आहे, ती गोष्ट भारताने लक्षात ठेवून त्याला प्रत्त्युतर देणारी शस्त्रास्त्रे विकसित केली पाहिजेत आणि संरक्षणावर राष्ट्राच्या जीडीपीच्या ३ टक्के खर्च पुढील काही वर्षे केला पाहिजे.

प्रमुख वक्ते अभिजित हरकरे यांनी सांगितले की, हिंदू म्हणून जागतिक पातळीवर आपण स्वतःचे योगदान देणे आवश्यक आहे. भारत संपूर्ण जगाकडे ‘वसुधैव कुटम्बकम्’ या विचाराने पहातो आहे. भारताने किंवा हिंदूंनी कोणत्याही देशावर आक्रमण करून तिथली संस्कृती संपवली नाही. म्हणूनच आपणही एक भारतीय आणि हिंदु म्हणून आपल्या परंपरेत असणारे मूल्ये अन् संस्कार जागतिक पटलावर आणणे आवश्यक आहे. यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

अरविंद कोकजे म्हणाले की, नोव्हेंबर १९६९ मध्ये बलवंतमधून पत्रकारितेला प्रारंभ केला. लोकसत्ता, सा. विवेकसाठी काम केले. हा खरा सन्मान स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार सा. बलवंतचा आहे, असे पुरस्कार मिळणे दुर्मिळ असते.

संदेश फडकले यांनी सांगितले की, कोकण संस्कृती ‘यू ट्यूब’ चॅनेलमार्फत कोकणातील खाद्य, संस्कृती, कृषी, लोककला याची माहिती देतो. हिंदु संस्कृतीचे कोकणात जागर केला जातो. शक्ती- तुरा, नमनातून मनोरंजनासमवेत प्रबोधन केले जाते. आज राष्ट्रहित आणि हिंदु संस्कृती यांची माहिती प्रभावीपणे पोचवणे, हे आपले दायित्व आहे.

कार्यक्रमाला उपस्थित श्रोते

प्रास्ताविकामध्ये डॉ. भांडारकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार सोहळा भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला मान्यता देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहितीचा वाहक नसून, राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे. सत्य आणि तथ्यावर आधारित पत्रकारिता करणार्‍या निर्भीड पत्रकारांना प्रोत्साहन देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे देवर्षि नारद पत्रकार सन्मान आहे. यावर्षी या पुरस्कारांचे रौप्य महोत्सवी वर्ष असून प्रतिवर्षी येथे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आहे.

विभाग रा.स्व. संघ सहकार्यवाह डॉ. प्रफुल्ल सप्रे, राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत सहकार्यवाहिका उमाताई दांडेकर, रायगड रा.स्व. संघ विभाग कार्यवाह विजय सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा रा.स्व. संघचालक अरविंद कुडतरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. देवर्षि नारद पुरस्कार निवड समितीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर आणि सुकांत चक्रदेव यांनाही सन्मानित करण्यात आले. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर यांनी आभार मानले. भूषण शितूत यांनी म्हटलेल्या पसायदानाने सांगता झाली.