कोविडसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये; काळजी घ्यावी ! – सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई – राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये कोविडची सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोविड पडताळणी आणि उपचार यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांच्या स्तरावर सर्व यंत्रणांना रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सद्यःस्थितीत राज्यात आय.एल्.आय. (इन्फ्ल्यूएंझासारखा आजार) आणि एस्.ए.आर्.आय. (गंभीर श्वसनसंसर्ग) यांचे सर्वेक्षण चालू आहे. त्यांतील रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. जानेवारी २०२५ पासून १२ सहस्र ११ रुग्णांची कोविड चाचणी केली असून त्यांपैकी ८७३ कोव्हीडचे रुग्ण आढळले आहेत.

फ्ल्यूसदृश आजार असलेल्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करण्यात येत आहे. त्यांचे नमुने संपूर्ण ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी एन्.आय.व्ही., पुणे आणि बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे, तसेच राज्यातील इतर प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात येतात.