Operation Sindoor Symbolizes New India : ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पालटत्या भारताचे चित्र ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘मन की बात‘मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

नवी देहली – आज प्रत्येक जण देशभक्तीच्या भावनांनी भरलेला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक सैनिकी मोहीम नव्हती, तर ते आपला दृढ निश्चय, धैर्य आणि पालटता भारत यांचे चित्र आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील मासिक ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १२२ व्या भागात केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की,

१. संपूर्ण देश आतंकवादाच्या विरोधात एकवटलेला पहायला मिळाला. प्रत्येकाला वाटत होते की, आतंकवाद संपवला जावा. आपल्या सैन्याने सीमेपलीकडील आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

२. ‘ऑपरेशन सिंदूर’ आता अनेक भारतियांचा जीवनाचा भाग बनले आहे. बिहारमधील कटीहार, उत्तरप्रदेशमधील कुशीनगर आणि इतर अनेक ठिकाणी जन्मलेल्या बाळांना सिंदूर हे नाव देण्यात आले.

३. भारतीय सैन्याने आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, हे त्यांचे अतुलनीय शौर्य होते. यासाठी त्यांनी भारतात सिद्ध करण्यात आलेली शस्त्रे, तसेच तंत्रज्ञान यांचा वापर केला.

४. माओवादाच्या विरोधात सामूहिक लढाई चालू असून गडचिरोली सारख्या भागात नागरिकांना मूलभूत सुविधा पोचू लागल्या आहेत. येथील काटेझारी गावात प्रथमच बस पोचली. गावातील लोकांनी ढोल वाजवून या बसचे स्वागत केले.