पुणे येथे तिसरा ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्कार सोहळा पार पडला !

‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते चैत्राम पवार यांची उपस्थिती !

पुणे, ४ मे (वार्ता.) : प्रसारमाध्यम, जनजाती कल्याण, धर्मजागरण, सामाजिक समरसता आणि गोरक्षण या क्षेत्रांमध्ये हिंदुत्वाचे काम करणार्‍या विविध मान्यवरांना ३ मे या दिवशी ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्काराचे वितरण ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते चैत्राम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन तुषार दामगुडे, शेफाली वैद्य यांसह स्नेहल कुलकर्णी, अमोल शुक्ला आदींनी केले होते.

पुरस्कार वितरण करतांना ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते चैत्राम पवार (डावीकडून दुसरे) आणि सौ. शेफाली वैद्य (उजवीकडून दुसऱ्या) सोबत इतर पुरस्कार विजेते आणि मान्यवर

स.प. महाविद्यालयातील ‘लेडी रमाबाई सभागृहा’त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. या वेळी पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कार अर्चना तिवारी यांना, वर्षा परचुरे यांना जनजाती कल्याण, श्री. अविनाश तायडे यांना धर्मजागरण, श्री. पराग दिवेकर यांना सामाजिक समरसता आणि श्री. अश्विन संपतकुमारम् यांना गोरक्षण यांसाठी पुरस्कार देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, मानपत्र आणि ११ सहस्र रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी मुलाखतींच्या माध्यमातून पुरस्कार्थींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक सौ. शेफाली वैद्य यांना भेट देतांना वार्ताहर साधक श्री. जयेश बोरसे

हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांकडून कार्य करण्याची प्रेरणा मिळावी हा कार्यक्रमाचा उद्देश ! – शेफाली वैद्य, हिंदुत्वनिष्ठ लेखिका

लेखिका सौ. शेफाली वैद्य

मनोगत व्यक्त करतांना संयोजिका शेफाली वैद्य म्हणाल्या की, तळागाळात जाऊन निःस्वार्थीपणे हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या मान्यवरांची सर्वांना ओळख नसते. त्यांची ओळख व्हावी, त्यांच्याकडून शिकता यावे आणि कार्य करण्याची प्रेरणा व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्याला वाटते की, काश्मीरसारखी स्थिती आपल्या येथे नाही; पण आजची पौड येथील घटना पाहिल्यास धर्मांधांची मानसिकता किती घाणेरडी आहे, हे लक्षात येते. यासाठी आपण अनभिज्ञ रहाता कामा नये.