नवी देहली – भारताने पाकिस्तानसमवेतची आयात आणि निर्यात पूर्णपणे बंद केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानचे कोणतेही साहित्य भारतात येणार नाही. पाकिस्तानमध्ये सिद्ध झालेल्या किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणतीही वस्तू भारतात येणार नाही. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे की, जर आयातीची आवश्यकता भासत असेल, तर त्यासाठी भारत सरकारची विशेष मान्यता घेणे आवश्यक असेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये व्यापारी संबंध मर्यादित आहेत; परंतु दोन्ही देश एकमेकांना काही वस्तूंची आयात-निर्यात करतात. पाकिस्तान भारताला सुकामेवा, टरबूज, सिमेंट, सैंधव मीठ निर्यात करतो, तर भारताकडून दगड, चुनखडी, चष्म्यासाठी ऑप्टिकल वस्तू, कापूस, स्टील, सेंद्रिय रसायने, धातू संयुगे आणि चामड्याच्या वस्तू आयात करतो.