
पुणे – येत्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सेवा आदी सेवा सुविधा योग्य त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यास सर्व शासकीय यंत्रणांनी आता पासूनच नियोजन करावे. वारकर्यांची कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनासाठी आयोजित संवाद बैठकीत पुणे जिल्हाधिकारी डूडी बोलत होते. आरोग्य सुविधा, शौचालये, पाणीपुरवठा आदी सर्व सुविधा गेल्या वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
या बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आदी उपस्थित होते.