कलकत्ता उच्च न्यायालयाने भारतीय जनता युवा मोर्चा संघटनेला दिली ‘बंगाली हिंदू वाचवा’ मोर्चा काढण्याची अनुमती !

कलकत्ता उच्च न्यायालय

कोलकाता (बंगाल) – कलकत्ता उच्च न्यायालयाने भारतीय जनता युवा मोर्चा संघटनेला ‘बंगाली हिंदू वाचवा’ मोर्चा काढण्याची अनुमती दिली आहे. १९ एप्रिल या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भवानीपूर येथील श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या घरासमोरून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे.

पीडितांच्या पुनर्वसनाविषयी योजना सिद्ध करण्याचा सरकारला आदेश !

मुर्शिदाबाद हिंसाचारावर कलकत्ता उच्च न्यायालयात सुनावणी झाली. अधिवक्त्या प्रियांका तिब्रेवाल म्हणाल्या की, उच्च न्यायालयाने पीडितांच्या पुनर्वसनावर भर दिला आहे आणि राज्य सरकारला पीडितांचे पुनर्वसन कसे केले जाईल ? याची योजना सिद्ध करण्यास अन् तोपर्यंत त्यांच्या जेवणाची अन् रहाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. (असा आदेश उच्च न्यायालयाला का द्यावा लागतो ? सरकार स्वतःहून हे का करत नाही ? सरकार नावाचा डोलारा कशासाठी आहे ? – संपादक) एक समिती स्थापन करण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे. यात राज्य आणि केंद्रीय मानवाधिकार आयोग यांतील लोकांचा समावेश असेल. ते पीडितांशी बोलतील आणि सर्व तक्रारी नोंदवतील. केंद्रीय दलांना सध्या तेथे तैनात रहाण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यपालांनी मुर्शिदाबादमध्ये जाऊन पीडितांची घेतली भेट

बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबाद येथे जाऊन तेथील पीडित हिंदूंची भेट घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना मुर्शिदाबादचा दौरा पुढे ढकलण्यास सांगितले होते; परंतु बोस यांनी त्यास नकार दिला होता. (स्वतःच्या राज्यातील पीडित हिंदु नागरिकांना वार्‍यावर सोडणार्‍या ममता बॅनर्जी यांना बंगाली हिंदू पुन्हा सत्तेवर बसवून आत्मघात करून घेणार आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक) मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या नावाखाली मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांची घरे लुटून ती जाळली. यात ५०० हून अधिक हिंदू बेघर झाल्याने त्यांनी पलायन करून मालदा येथील शाळेत आश्रय घेतला आहे.