First ‘AI’ University In Maharashtra : देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार ! – आशिष शेलार, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री

विद्यापिठाच्या माध्यमातून भारतीय तरुण जागतिक अर्थव्यवस्थेत नेतृत्व करण्यासाठी सिद्ध होणार !

आशिष शेलार

मुंबई – देशातील पहिले ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे, असे राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी घोषित केले.

ते म्हणाले…,

१. ‘विकसित भारत २०४७ मिशन’ची यशस्वी पूर्तता आणि भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण अन् तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देशातील पहिले कृत्रिम बुद्धीमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.

२. कृत्रिम बुद्धीमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.

३. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रेरित उद्योग आणि तंत्रज्ञान क्रांतीसाठी विद्यार्थी अन् तरुण यांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणारे हे विद्यापीठ असेल.

४. या विद्यापिठासाठी विशेष ‘टास्कफोर्स’ स्थापन करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली या धोरणाचा आराखडा सिद्ध होईल.

५. तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असेल. आमचे सरकार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नवसंकल्पनांच्या संधी निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणात परिवर्तन घडवून भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ घडवण्याच्या दृष्टीने कटीबद्ध आहे.

६. महायुती सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे हे विद्यापीठ अत्याधुनिक संशोधन आणि कौशल्य विकासासाठी केंद्रस्थानी राहील. हे विद्यापीठ भारतीय तरुणांना कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेत नेतृत्व करण्यासाठी सिद्ध करेल.