Urbanisation leads To Temperature : शहरीकरणामुळे भारतातील १४० हून अधिक शहरांच्या तापमानात ६० टक्के वाढ !

मुंबई – काँक्रिटीकरणामुळे भारतातील शहरांच्या उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. शहरीकरणामुळे भारतातील १४० हून अधिक मोठ्या शहरांच्या तापमानात ६० टक्के वाढ झाली आहे, असे ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ या देहली येथील संशोधन संस्थेने एका पर्यावरणाविषयीच्या अहवालात नमूद केले आहे. या संस्थेने नवी देहली, मुंबई, कोलकाता, भाग्यनगर (हैदराबाद), बेंगळुरू आणि चेन्नई या महानगरांचे या अहवालामध्ये विश्‍लेषण केले आहे.


या विश्‍लेषणात ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ने म्हटले आहे की, मागील काही वर्षांसारखी शहरांमध्ये आता परिस्थिती राहिलेली नाही. आर्द्रतेमुळे सर्व शहरी भागांमध्ये तापमानात वाढ होत आहे. बेंगळुरू वगळता अन्य ५ महानगरांमध्ये २००२ ते २०१० च्या तुलनेत वर्ष २०१४ ते २०२३ पर्यंत उन्हाळ्यातील सरासरी सापेक्ष आर्द्रता ५ ते १० पटींनी वाढली आहे. काँक्रीट आणि डांबरी पृष्ठभाग दिवसा उष्णता शोषून घेतात आणि संध्याकाळी सोडतात. यामुळे रात्रीचे तापमान वाढते. पाऊस आणि प्रदूषण यांसह हवामानाच्या अन्य घटकांवरही याचा परिणाम होतो. शहरीकरण आणि स्थानिक हवामानातील पालट यांमुळे मागील २ दशकांमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे.

संपादकीय भूमिका

वाढते शहरीकरण धोकादायकच ! तापमानातील वाढ पहाता सरकारने यावर तत्परतेने उपाययोजना राबवणे आवश्यक !