(म्हणे) ‘मुलांच्या डोक्यात काय घालण्याचा प्रयत्न चालू आहे, हे कळत नाही !’ : शरद पवार

‘एस्.सी.ई.आर्.टी.’च्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यावरून शरद पवार यांना पोटशूळ !

मुंबई – मनस्मृतीचा अभ्यास करण्याच्या प्रकरणी या सरकारची मानसिकता काय आहे? हे लक्षात येते. याविषयी आम्हाला आग्रही भूमिका घ्यावीच लागेल. शिक्षणक्षेत्रातील जाणकारांनी याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, अन्यथा  प्रादेशिक संस्था स्वस्थ बसणार नाहीत. मुलांच्या डोक्यात नेमके काय घालण्याचा प्रयत्न चालू आहे ? हे कळत नाही, अशा शब्दांत अभ्यासक्रमात मनस्मृति आणि मनाचे श्लोक यांचा समावेश करण्याच्या सूत्रावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आक्षेप घेतला. २४ मे या दिवशी यशवंतराव प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ‘राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (‘एस्.सी.ई.आर्.टी.’च्या) अभ्यासक्रमात मनस्मृति आणि मनाचे श्लोक यांचा समावेश करण्यात येणार असल्याविषयीचा प्रश्न शरद पवार यांना विचारला.  त्यावर त्यांनी वरील विधान केले. या वेळी शरद पवार म्हणाले, ‘‘राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृति आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार चालू असल्याची गोष्ट माझ्या कानावर आली आहे. यावरून राज्यशासनाची राज्यघटनेविषयीची काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. सामाजिक संस्थांनी याची नोंद घेतली पाहिजे.’’

अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः ।
चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्यायशोबलम् ।।

अर्थ : ज्येष्ठ नागरिक, पालक, शिक्षक यांची सेवा आणि आदर केल्यास आयुष्य, विद्या, यश अन् बळ वाढते.

मनुस्मृतीतील वरील श्लोकाचा उल्लेख राज्य अभ्यासक्रम प्रारूप आराखडा – शालेय शिक्षण (एस्.सी.एफ्. – एस्.इ.) (भाग ब) यातील ‘मूल्य आणि सेवाभावी वृत्ती’ या अंतर्गत करण्यात आला आहे. मनुस्मृती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

मनुस्मृतीचा श्लोक वेळीच शिकवला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुंबई – अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध, ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणार्‍या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला आहे; परंतु आज त्यांच्या पक्षाची स्थिती पाहिली, तर ‘वयोवृद्ध’ म्हणून त्यांना कोण मान देत आहे ? त्यांच्या पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडले आहेत. मनुस्मृतीमधील हा श्लोक त्यांनी वेळेत शिकवला असता, तर त्यांच्या पक्षावर आजची वेळ आली नसती, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

या वेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकाचा उल्लेख आल्यामुळे समस्त पुरोगाम्यांना पोटशूळ उठला आहे. जणू काही आता मनूचे राज्य आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था येणार आहे ! मुळात देशात राज्यघटनात्मक व्यवस्था, सर्वोच्च न्यायालय असतांना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का ? धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आहे की, कलियुगासाठी पराशरस्मृतीचा उपयोग केला पाहिजे. यातील एका श्लोकात म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिक, पालक, तपोवृद्ध, वयोवृद्ध यांचा आदर केला, तर कीर्ती, बळ आणि यश वाढेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृती जाळल्याचा उल्लेख सातत्याने केला जातो; परंतु ११ जानेवारी १९५० या दिवशी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात भाषण करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये वारसा हक्क आणि स्त्रियांसाठी दायभाग यांच्यासाठी मी मनस्मृतीचा उपयोग केला असल्याचे म्हटले. ‘जेथे स्त्रियांचे पूजन होते, तेथे देवता वास करतात’ ही मनुस्मृतीची शिकवण आहे. जगात मनुस्मृती हा एकमेव धर्मग्रंथ आहे, ज्यामध्ये संपत्तीमध्ये महिलांचा सहभाग दिला आहे. हा अधिकार केवळ भारतामध्ये होता. अशा मनुस्मृतीचा चांगला श्लोक अभ्यासक्रमातून रहित करण्याची भूमिका मांडणे हा बौद्धिक आतंकवाद आहे.’’

जर हे पुरोगामी मनुस्मृतीला इतका विरोध करतात, तर ‘कोलकाता कुराण पिटिशन’मध्ये त्या ग्रंथातील समाजात विद्वेष पसरवणार्‍या आयतांना विरोध करण्याचे धाडस ते दाखवतील का ?

संपादकीय भूमिका

  • शिक्षणाच्या नावाखाली अनेक मदरशांतील मुलांच्या डोक्यात काय घातले जाते ?, असा प्रश्न कधी शरद पवार यांना पडला का ?
  • स्वार्थी आणि दूषित राजकारणामुळे नव्हे, तर केवळ हिंदु धर्मामुळे समाजातील नैतिकता टिकून आहे. ‘हिंदु धर्माचे ज्ञान मिळाल्यावर भावी पिढी तेजस्वी आणि धर्माभिमानी बनेल अन् स्वत:ची पोळी भाजणार्‍यांची दुकाने बंद होतील’, अशी तर भीती राजकारण्यांना वाटत नाही ना ?