लांजा, रत्नागिरी येथे ५ मे या दिवशी ज्योतिष संमेलन

रत्नागिरी – श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी या ‘आय.एस्.ओ.’ मानांकित संस्थेच्या वतीने १५ वे एकदिवसीय ज्योतिष संमेलनात ‘पुरस्कार वितरण सोहळा’ आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांचा ‘पदवीदान समारंभ’ रविवार, ५ मे या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत लांजा तालुक्यातील मठ येथील गोरखनाथ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात दाते पंचागकर्ते मोहन दाते यांना ‘पद्मश्री’, पितांबरी उद्योग समूहाचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘कार्यगौरव’, ओंकार कुलकर्णी, श्रीरामपूर यांना ‘युवा ज्योतिषी’, विवा साठे यांना ‘नावीन्यपूर्ण लेखन’, तर सकाळ माध्यम समूह (रत्नागिरी आवृत्ती) यांना ‘चैतन्य माध्यम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

संस्थेच्या मागील वर्षी पार पडलेल्या कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, वास्तूशास्त्र विशारद, मुखचर्याशास्त्र (प्रवीण, प्राज्ञ, विशारद), ज्योतिर्विद्या वाचस्पती या अभ्यासक्रमात यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे पदवीदान आणि कौतुक सोहळा होणार आहे.  या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक रवींद्र (अण्णा) सामंत, डॉ. रवींद्र खाडिलकर, गुरुश्री प्रिया मालवणकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.