हिंदूंच्या संतांवर खोटे अरोप करून हिंदु संत आणि धर्म यांना अपकीर्त करण्यासाठी हिंदुद्वेष्टे रचत असलेले कुटील षड्यंत्र !

१. श्री रामचंद्रपूर मठाच्या प्रमुखांवर लैंगिक शोषण केल्याचा एका महिलेकडून आरोप

‘एका ५१ वर्षीय महिलेने कर्नाटकच्या श्री रामचंद्रपूर मठाचे प्रमुख जगद्गुरु शंकराचार्य श्री राघवेश्वर भारती यांच्यावर १६९ हून अधिक वेळा दुष्कर्म केल्याचा आरोप केला होता. श्री राघवेश्वर भारती यांच्याविरुद्ध लावलेले दुष्कर्माचे सर्वच आरोप ३१.३.२०१६ या दिवशी बंगळुरू सत्र न्यायालयाने फेटाळून लावले.

२. पैसे उकळण्यासाठी श्री राघवेश्वर भारती यांच्यावर खोटे दोषारोप

प्रथमदर्शी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यापूर्वी फिर्यादीच्या (आरोप करून दावा लावणारी महिला) पतीने श्री राघवेश्वर भारती यांच्याकडे ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. या दाव्यामध्ये दांपत्याला अटक करून त्यांची चौकशीही करण्यात आली होती.

३. न्यायालयाने दिलेल्या आदेशाद्वारे दावा करणार्‍या महिलेचा स्वार्थी उद्देश आणि  स्वामीजींना अपकीर्त करण्याचा केलेला प्रयत्न उघड

श्री राघवेश्वर स्वामी यांच्या दाव्यामध्ये न्यायालयाने त्यांच्या आदेशात असा स्पष्ट उल्लेख केला आहे की, आरोप लावणार्‍या महिलेने स्पष्टपणे सांगितले आहे, ‘मी मध्यंतरी ६ मांसाहून अधिक काळ मठाशी संबंधित उपक्रमांपासून दूर होते.’ जर स्वामीजींवर केलेल्या आरोपांनुसार तिला खरोखर लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला असता, तर तिने पुन्हा मठात यायलाच नको होते. ‘त्या महिलेचे मठात परत येणे’, हे तिचा गुप्त आणि स्वार्थी उद्देश पूर्ण करण्यासाठी, तसेच स्वामीजींची प्रतिमा अपकीर्त करण्यासाठी रचलेल्या एका सुनियोजित अन् भयावह कटाची रूपरेषा स्पष्ट करते. ती महिला सांगते की, तिच्यासमवेत वर्ष २००१ मध्ये तथाकथित घटना घडली होती आणि वर्ष २००२ मध्ये तिची लहान बहीण मठात रहायला आली होती. ‘जर एखाद्या महिलेवर एखाद्या ठिकाणी बलात्कार झाला असेल, तर अशा ठिकाणी तिची लहान बहीणही रहायला जावी ? असे तिला वाटेल का ? अशी मुळीच शक्यता नाही.’

४. श्री राघवेश्वर भारती यांना निर्दाेष सोडण्याविषयी न्यायालयाच्या निर्णयातील सूत्रे

अ. श्री राघवेश्वर भारती यांच्यावरील या दाव्यातील निर्णयात न्यायालयाने असेही लिहिले आहे की, ‘या दाव्यातील तथाकथित घटनेच्या दिवसानंतर आणि ३ वर्षांहून अधिक कालावधीनंतर हा दावा नोंदवण्यात आला. या दाव्याशी संबंधित कागदपत्रे आणि पुरावा ८२ दिवसांनंतर न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहेत’, या गोष्टींच्या आधारावरही आरोपीला निर्दाेष सोडले पाहिजे.

आ. या प्रकरणात फिर्यादी पक्षाच्या साक्षीदार आणि फिर्यादी यांच्या साक्ष या गोष्टी फिर्यादी पक्षाच्या विरुद्ध गोष्टी दाखवत आहेत. राघवेश्वर भारती यांच्या खटल्यामध्ये महिलेच्या भ्रमणभाषवरील संपर्क सूची (कॉल डिटेल रजिस्टर) आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या साक्षी यांवरून असे लक्षात येते, ‘तथाकथित घटनेच्या वेळी ती महिला तेथे नव्हतीच !’

५. हिंदु संतांवर खोटे आरोप करून हिंदुत्वावर आघात करण्याचे हे षड्यंत्र !

छुप्या पद्धतीने हिंदुत्वाला नष्ट करण्याचे एक मोठे षड्यंत्र कशा प्रकारे चालवले जात आहे, त्याचे श्री राघवेश्वर भारती यांच्यावरील दावा हे आणखी एक प्रत्यक्ष उदाहरण आहे. माननीय न्यायाधीश जी. बी. मुदीगौदर यांनी म्हटले, ‘‘आरोपी स्वामी राघवेश्वर भारतीजी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही. हा खटला म्हणजे आरोपीला केवळ नाहक त्रास देणे आणि त्यांची मानहानी करणे, या प्रयत्नांविना दुसरे काहीच नाही.’’

– श्री. रु. भ. ठाकूर

(संदर्भ : मासिक ‘ऋषिप्रसाद’)

(यावरून लक्षात येईल की, हिंदु संत आणि धर्म यांना कलंकित करण्याचे षड्यंत्र कशा प्रकारे केले जात आहे ? हिंदु संत आणि धर्म यांच्यावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता यावरून प्रतीत होते ! – संपादक)