हिंदु धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या स्मारकासमोर राहुल गांधी यांची सभा झाली. सावरकरांच्या विरोधात बोलणारे राहुल गांधी यांच्यासमवेत, सनातन धर्माचा अवमान करणारे स्टॅलिन, फारूख अब्दुल्ला यांच्यासमवेत बसावे लागत आहे, त्यासाठी ठाकरे गटाच्या लोकांनी प्रथम स्वा. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची क्षमा मागायला हवी होती. राहुल गांधींनी ‘हिंदु धर्माची शक्ती’ असा उल्लख केला. हिंदु धर्माची शक्ती समाप्त करण्याची ताकद आहे का त्यांच्याकडे ? हिंदु धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

१७ मार्च या दिवशी मुंबईत ‘शिवाजी पार्क’मध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ही सभा म्हणजे ‘फॅमिली गॅदरिंग’ (कौटुंबिक मेळावा) होते. ‘भानुमती का कुणबा, कहीं से इंटे, कहीं से रोडे’ अशी म्हण आहे. सगळे नैराश्य चेहर्‍यावर असलेले लोक तिथे होते. उत्तरप्रदेश, बिहारमधून तडीपार, हद्दपार झालेले लोक तिथे आले होते. त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते की, पकडून आणलेले लोक तिथे होते. हे दुर्दैवी आहे. ‘माझ्या तमाम हिंदु बांधव-भगिनींनो’ हा उद्धव ठाकरे यांचा शब्द काल बंद झाला. यावरून लक्षात आले की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांची भूमिका, धोरण हे सगळे त्यांनी सोडले आहे.