Rajgad Water Pollution : पुणे जिल्ह्यातील राजगडावरील पिण्याचे पाणी प्रदूषित !

पुणे – किल्ले राजगडावरील तळ्यांमध्ये पुरेसे पाणी आहे; परंतु स्वच्छतेअभावी ते पाणी प्रदूषित झाले आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना पाणी विकत घ्यावे लागते. गडावरील खाद्यपदार्थ विक्रेते पाण्याची वाढीव दराने विक्री करत आहेत. याकडे पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ‘गडावरील तळ्याची स्वच्छता करून ते पाणी पिण्यास योग्य करावे’, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. (अशी मागणी शिवप्रेमींना का करावी लागते ? – संपादक)

१. गडावर पुरातत्व विभागाचे पहारेकरी मुक्कामी असतात. सायंकाळी ५ नंतर गडाचे दरवाजे बंद करून ते पहारा देतात. छत्रपती शिवरायांच्या राजसदरेच्या मागील बाजूला असलेल्या ‘राणीवसा तळ्या’च्या झर्‍यांतील पाणी पहारेकर्‍यांना आणावे लागते. ‘दूषित पाण्यामुळे गडावर रहाणे कठीण झाले आहे’, असे पहारेकरी सांगतात. (अशी स्थिती निर्माण होण्याला उत्तरदायी असलेल्या पुरातत्व विभागातील अधिकार्‍यांवर सरकार कठोर कारवाई कधी करणार ? – संपादक)

२. या प्रकरणी पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे म्हणाले, ‘‘राजगडावरील तळ्यांमध्ये पुरेसे पाणी आहे. सध्या पर्यटकांची संख्या वाढल्याने उन्हाळ्याच्या कालावधीत पाणी लगेच संपून जाते. इतर तळ्यांमधील पाण्यांचे शुद्धीकरण करून ते पिण्यायोग्य करण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र आराखडा सिद्ध करण्यात येत आहे.’’ (पहारेकर्‍यांच्या विधानाविषयी सहसंचालक काही बोलतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

झोपी गेलेला पुरातत्व विभाग ! महाराष्ट्रातील गड-दुर्गांची दुःस्थिती होण्यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग विसर्जित करा !