आतंकवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र…?

आतंकवादी कारवायांमागील मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर कठोर कारवाई केल्यासच देशविघातक शक्तींना जरब बसेल !

गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षा व्यवस्थांनी केलेल्या कठोर उपायांमुळे देशापुढील आतंकवादाचे आव्हान बर्‍याच अंशी नियंत्रणात असले, तरी आजही हा धोका टळलेला नाही, हे महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ४४ ठिकाणी ९ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) टाकलेल्या धाडींमध्ये स्पष्ट झाले आहे. या वेळी १५ जणांना अटक करण्यात आली. पडघा (जिल्हा ठाणे) या गावाचे नामांतर करून ‘अल् शाम’ ठेवण्यासह त्याला सीरियाचा भाग घोषित करण्यात आले होते,  तसेच ऑगस्ट मासात पुण्यात पकडण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून उघडकीस आलेल्या माहितीतून वरील गोष्ट स्पष्ट झाली आहे. विविध सामाजिक माध्यमांतून चालू असलेल्या मूलतत्त्ववादाच्या प्रसाराला आपल्याकडील सुशिक्षित मुसलमान तरुणही कसे भुलले आहेत, हे यातून पुन्हा एकदा दिसून आले. भविष्यातील धोक्यांचा विचार करता भारताने यासंदर्भात एक विशेष कायदा करण्याची तातडीने आवश्यकता आहे.

१. धर्मांधांना विविध प्रकारचे प्रशिक्षण !

श्री. प्रवीण दीक्षित

‘एन्.आय.ए.’ने पडघा गावातील प्रकरणी ज्या १५ जणांना अटक केली, त्यात आतंकवादी साकिब नाचन, त्याचा मुलगा शामिल नाचन, भाऊ अकिब नाचन यांचा समावेश आहे. या आरोपींनी मुंबईसह अनेक ठिकाणी जाऊन ‘रेकी’ केली होती. त्यांना विदेशातून पैसा मिळत होता. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे आक्रमण करण्याची त्यांची सिद्धता होती. त्यांना ड्रोनने आक्रमण करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. साकिब नाचन हा संघटनेत सहभागी होणार्‍यांना ‘बायथ’, म्हणजे ‘इसिस’साठी निष्ठा ठेवण्याची शपथ देत होता. पुण्यातील डॉ. अदनान अली सरकार हे त्याचे ठळक उदाहरण म्हणून सांगता येईल.

२. जिहादी संघटनांकडून भारतविरोधी विषारी प्रचार आणि त्यांच्याकडून केली जाणारी कारस्थाने !

नुकतेच पुण्यामध्ये ‘एन्.आय.ए.’ने आणि आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) पकडलेल्या काही संशयित आरोपींच्या अन्वेषणामधून देशविघातक शक्तींची कारस्थाने पडद्यामागे कशा पद्धतीने चालू आहेत, याचा पर्दाफाश झाला आहे. ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेचा अस्त झाला आहे’, असे मानले जात असले, तरी प्रत्यक्षात ती पूर्णतः अद्यापही नामशेष झालेली नाही. या संघटनेचे काही लोक मारले गेले असतील; परंतु या संघटनेतील स्वतःला म्होरक्या म्हणवणारे काही जण मात्र आजही कार्यरत आहेत आणि ते स्वतःचा कुप्रचार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारत हा अशा आतंकवादी संघटनांच्या नेहमीच निशाण्यावर राहिला आहे; कारण भारत हा लोकशाही मानणारा देश आहे आणि या संघटनांना लोकशाही मान्य नाही. काश्मीरचे निमित्त करून या आतंकवादी संघटना सातत्याने भारतविरोधी कारवाया करत असतात. विशेषतः विविध सामाजिक माध्यमांमधून भारतातील सुशिक्षित मुसलमानांमध्ये धार्मिक मूलतत्त्ववादाचा प्रसार करून त्यांची माथी भडकावण्याचे काम या संघटनांच्या माध्यमातून होत आहे. अशा प्रकारचा मूलतत्त्ववाद आणि कट्टरतावाद यांमुळे प्रभावित झालेले लोक आपल्याला देशभरात अनेक ठिकाणी सापडत आहेत. तमिळनाडूत कोईम्बतूरमध्ये मंदिराजवळ गाड्या जाळून केलेला स्फोट असो किंवा बिहार, कर्नाटक, राजस्थान, देहली आणि भोपाळ अशा अनेक ठिकाणांवरून पकडण्यात आलेले आरोपी असोत, त्यांच्याकडून उघड झालेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे. नेहमीप्रमाणे ‘इस्लाम खतरे में है’ (इस्लाम धोक्यामध्ये आहे), असे सांगत या संघटना या लोकांची डोकी भडकावत असतात.

३. डॉ. अदनान अली सरकार याने गुप्तपणे केलेले कार्य !

दुर्दैवाने सुशिक्षित किंवा मुक्त विचारांचे लोकही या धार्मिक उन्मादात फसलेले दिसून येतात. याचे ठळकपणाने दिसणारे उदाहरण म्हणून ‘एन्.आय.ए.’च्या धाडीमध्ये पकडण्यात आलेल्या डॉ. अदनान अली सरकार याच्याकडे पहावे लागेल. ससूनसारख्या वैद्यकीय महाविद्यालयातून त्याने डॉक्टरकीची पदवी मिळवलेली आहे. त्याची नोकरी-व्यवसाय उत्तमरित्या चालू होते. तो मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये भूलतज्ञ म्हणून काम करत होता; परंतु धार्मिकरित्या तो पूर्णपणे बिथरलेला होता. असे असले, तरी त्याने त्याच्या आजूबाजूच्या नागरिकांना कसलाही सुगावा लागू न देता बाँब बनवण्यात निष्णात असणार्‍यांना हाताशी धरून काही इंजिनीयर्सना धार्मिक मूलतत्त्ववादी बनवले आणि त्याने ‘अल् सुफा’ नावाची एक संघटना चालू केली. अल् सुफा, म्हणजे प्रेषित महंमद यांचे रक्षक. भूलतज्ञ झालेला डॉ. अदनान सरकार याचे लक्ष्य युवक होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मानसिकरित्या दुर्बल असणार्‍या युवकांना शोधून त्यांना तो आतंकवादी बनवत होता. त्यासाठी त्या युवकांना पैशांची लालसा दाखवत होता.

४. देशभरात जिहादी संघटनांनी वापरलेली वैशिष्ट्यपूर्ण ‘मोड्यूल्स’ (पद्धत) !

त्यापूर्वी राजस्थानमध्ये एप्रिल २०२१ या मासात इम्रानभाई नावाच्या एका व्यक्तीने मध्यप्रदेशात काही लोकांना हाताशी धरून ठिकठिकाणी बाँबस्फोट घडवून आणण्यासाठी प्रयत्न चालवले होते; परंतु वर्ष २०२२ मध्ये यातील काही जण रतलाममधून बाँब घेऊन जात असतांना पकडले गेले. त्या वेळी २ जण तेथून पसार होण्यात यशस्वी झाले. ते बाँब बनवणारे होते. या दोघांसह अन्य एका व्यक्तीला पोलिसांनी पुण्यामध्ये कोथरूड येथे पकडले. त्यातून या सर्वांचे षड्यंत्र उघडकीस आले. वस्तूतः या संघटनेचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) किंवा मुख्यालय (सेंट्रल कमांड) सीरियामध्ये आहे आणि तेथून या संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिशादर्शन केले जात आहे, असे दिसून आले आहे. देहली, रतलाम आणि पुणे येथे या संघटनेची काही ‘मोड्यूल्स’ दिसून आली आहेत. देहली आणि रतलाम येथील या संघटनांच्या मॉड्यूलला ‘गेस्ट मोड्यूल’ म्हटले जाते, तर पुण्यातील मोड्यूलला ‘होस्ट मोड्यूल’ समजले जात होते. याचा अर्थ आपल्या नियोजित कामासाठी लोकांना आश्रय देणे, त्यांना आवश्यक असणारे साहाय्य देणे, ते पकडले जाणार नाहीत, याची व्यवस्था करणे, हे काम ‘पुणे मोड्यूल’च्या वतीने करण्यात येत होते. आता पकडल्या गेलेल्या संशयित आरोपींचे पूर्वीचे कसलेही रेकॉर्ड किंवा गुन्हेगारी पार्श्‍वभूमी उपलब्ध नाही; कारण सामाजिक माध्यमांवर संकेतांकांचा (‘कोडवर्ड्स’चा) वापर करून संदेशांचे देवाण-घेवाण करण्यावर त्यांचा भर राहिला. ही ‘मोडस ऑपरेंडी’ जगभरात दिसून आली आहे. सामाजिक माध्यमांवरील माहिती ‘एंड टू एंड इन्क्रिप्टेड’ (माहिती देवाण-घेवाण करतांना ती चोरी न होण्यासाठी वापरली जाणारी पद्धत) असल्यामुळे त्याविषयी सहसा कुणालाही पत्ता लागत नाही. आज संपूर्ण जगाला आतंकवाद्यांकडून होणार्‍या सामाजिक माध्यमांच्या वापराने हैराण केले आहे. त्यामध्ये भारत हाही एक बळी आहे.

५. आतंकवाद्यांची आक्रमण करण्याची ठिकाणे निवडण्याची पद्धत आणि त्यांच्या विचारसरणीमुळे होत असलेला धोका !

आता पकडण्यात आलेल्या ५ जणांच्या झाडाझडतीतून त्यांच्याकडे ड्रोन कॅमेरा, बाँब बनवण्यासाठीची पावडर आणि बाँब बनवण्याचे तंत्र हस्तगत करण्यात आले आहे. या सर्वांनी काही ‘सॉफ्ट टार्गेट्स’ची (सौम्य लक्ष्याची) किंवा संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. अशा ठिकाणांची निवड करतांनाही आतंकवादी संघटनांचे एक सूत्र असते. त्यानुसार साधारणतः कुणाचे लक्ष जाणार नाही आणि संरक्षणव्यवस्था अल्प असेल अशा; पण महत्त्वाच्या ठरू शकणार्‍या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा या संघटनांचा प्रयत्न असतो. मुंबईतील छाबडा हाऊस आणि ताज हॉटेल येथे २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेले आक्रमण हे याचे ठळक उदाहरण होते. अशा ठिकाणी आक्रमण करून अधिकाधिक लोकांना मारण्याचा यांचा प्रयत्न असतो.

‘टेलीग्राम’सारख्या सामाजिक माध्यमावरून त्यांना याविषयीच्या सूचना आणि कार्यपद्धत यांविषयीचे मार्गदर्शन केले जाते. मुख्य म्हणजे या लोकांची माथी भडकावतांना त्यांना ‘तुम्ही यामध्ये मारले गेला, तरी जन्नतमध्ये (स्वर्गामध्ये) जाल’, अशा प्रकारच्या भ्रामक गोष्टींनी प्रभावित केलेले असते. या भूलथापांना ही मंडळी भुलतात. अलीकडील काळात पकडलेले आरोपीही याचाच एक भाग आहेत. अर्थात् अशा विचारसरणीने प्रभावित झालेल्यांची संख्या मोठी असणारे काही भाग अलीकडील काळात दिसून आले आहेत. भिवंडीजवळील पडघा जसा ‘इसिस’चा जिल्हा घोषित करण्यात आला, तसेच देशात अशा प्रकारचे ‘छोटे पाकिस्तान’ अनेक ठिकाणी आहेत आणि तिथे बाहेरचा माणूस सहजासहजी जाऊ शकत नाही. तेथे पोलीस पोचले, तरी त्यांना काम करू दिले जात नाही. अशी स्थिती असल्यामुळे येणार्‍या काळातही अशा धार्मिक मूलतत्त्ववादाने प्रेरित असणार्‍या लोकांचा धोका देशाला रहाणारच आहे.

६. आतंकवादाच्या विरोधात विविध उपाययोजना ! आता प्रश्‍न उरतो, तो यावर उपाय काय ?

अ. पालकांनी स्वतःहून पुढे येऊन माहिती देणे आवश्यक : सर्वांत प्रथम देशभरातील मुसलमानांनी त्यांच्या भागामध्ये अशा प्रकारच्या संशयित वर्तणूक असणार्‍या लोकांची माहिती पुढे येऊन पोलिसांना कळवली पाहिजे. वर्ष २०१५-१६ मध्ये ‘इसिस’चा जोर होता, तेव्हा अनेक पालक पुढे येऊन त्यांच्या मुलांविषयीची अशा प्रकारची माहिती देत होते. त्या माहितीनुसार अशा मुलांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जात होता. पुण्यातील प्रकरणानंतर आता अशा प्रकारची माहिती पुढे येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

आ. नवीन कायदा हवा ! : दुसरा उपाय, म्हणजे भारत सरकारने इंग्लंडसारख्या देशांप्रमाणे यासाठी एक स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार अशा प्रकारच्या मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करता येऊ शकेल. यासाठी पोलिसांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. ‘भारतीय दंड संहिता’ (आयपीसी) आणि ‘बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियम’ (युएपीए) सारखे कायदे या समस्येसाठी पुरेसे नाहीत; कारण हा धोका पुष्कळ मोठा आहे. त्यामुळे विविध सुरक्षायंत्रणांनी ‘यासाठी स्वतंत्र कायद्याची आवश्यकता आहे’, असे सरकारला सांगितले आहे; कारण पोलिसांकडून होणार्‍या बुद्धीभेदाला कायद्याचा आधार नाही. त्यामुळे ब्रिटनच्या कायद्यांचा अभ्यास करून आपल्याकडेही लवकरात लवकर असा कायदा आकाराला येणे आवश्यक झाले आहे. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारखे अनेक देश या मूलतत्त्ववादाचा सामना करत आहेत. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी या देशांनी नवीन कायदे केले आहेत.

इ. आतंकवादाच्या प्रसाराला पायबंद घालण्यासाठी सामाजिक माध्यमांवर प्रतिबंध हवा ! : आणखी एक, म्हणजे सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून होणार्‍या आतंकवादाच्या प्रसाराला पायबंद घालण्यासाठी राष्ट्राराष्ट्रांनी माहितीची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. अन्यथा आपण आपल्या देशात ४-५ जणांना पकडून काहीही साध्य होणार नाही; कारण त्यांचा मुख्य सूत्रधार जिथे आहे, तेथून तो नवी प्यादी शोधेल आणि त्याचे काम चालू ठेवेल. त्यामुळे मुळावर घाव घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाचे आहे.

ई. देशविघातक शक्तींना जरब बसवण्यासाठी मुळावर घाव घालायला हवा ! : ज्याप्रमाणे अमेरिका त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला ठेच पोचवणार्‍या आतंकवाद्यांचा ड्रोनसारख्या अत्याधुनिक प्रणालींचा वापर करून ठार मारते, तशाच प्रकारे आपणही या सर्वांमागचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्या विरोधात कारवाई केली पाहिजे, तरच अशा देशविघातक शक्तींना जरब बसेल. आज आपल्या अन्वेषण यंत्रणांनी कारवाई करून या संशयितांना पकडले नसते, तर काय घडले असते, याची कल्पनाच केलेली बरी !

उ. संघटित प्रयत्न केल्यानेच आतंकवाद नियंत्रणात राहील ! : आज आपण ‘इसिस’शी सीरियाचे नाव जोडत असलो, तरी भारतातील या प्रकारांमागे पाकिस्तान आणि चीन यांचाही हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही; कारण हे लोकशाहीविरोधी देश आहेत, तसेच या राष्ट्रविघातक शक्तींना भारतात कुणाचे सरकार आहे याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. ते भारत हाच आपला शत्रू मानतात. त्यामुळे याविरोधातील उपाययोजना आणि कायदे यांना सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्यात्मक भूमिका घेत पाठिंबा दिला पाहिजे; कारण आतंकवाद हा सर्व लोकशाहीवादी देशांचा शत्रू आहे. त्यामुळे लोकांनी एकवाक्यतेने पुढे येऊन ‘अशा विघातक शक्तींविरोधात कारवाई करा. आम्ही सरकार समवेत आहोत’, असे सांगणे आवश्यक आहे. सरकार, विरोधी पक्ष, सतर्क नागरिक आणि प्रसारमाध्यमे या सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्यानेच हा आतंकवाद नियंत्रणात राहू शकतो.

– श्री. प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक (१६.१२.२०२३)