राष्ट्रीय महामार्ग रोखल्याविषयी राजू शेट्टींसह अडीच सहस्र कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

आंदोलनकर्ते शेतकरी

कोल्हापूर – साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना गत हंगामातील १०० रुपये द्यावेत, तसेच यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन ३ सहस्र ५०० रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांसह त्यांच्या सहकार्‍यांनी ९ घंटे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. त्यासाठी शिरोली पोलिसांनी राजू शेट्टींसह अडीच सहस्र कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

जिल्ह्यात ३७ (१) कलम लागू असून पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास किंवा सभा घेण्यास जिल्ह्यात बंदी आहे. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवला आणि बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याविषयी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (शेतकर्‍यांच्या उसाला भाव मिळाला पाहिजे, ही मागणी योग्यच आहे; मात्र त्यासाठी सामान्य माणूस, तसेच रस्त्यावरील वाहतूकदार यांना वेठीस का धरले जाते ? प्रशासनाने या संदर्भात असे प्रकार पुढे घडू नये; म्हणून योग्य त्या उपाययोजना अगोदरच करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

  • आता गुन्हा नोंद झाला; परंतु त्या वेळी नागरिकांना झालेल्या मानसिक हानीची भरपाई कशी होणार ?
  • प्रशासन समस्येवर वेळीच योग्य उपाययोजना न काढत असल्याचा परिणाम म्हणून जनतेला वेठीस धरले जाते, हे संतापजनक आहे !