अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे विधान !

डावीकडून हिमंत बिस्व सरमा आणि अकबरुद्दीन ओवैसी

गोहत्ती (आसाम) – एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत पोलिसांना धमकी दिली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. याविषयी आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी ‘ही पुष्कळ दुःखद घटना आहे. जर अशी घटना आसाममध्ये घडली असती, तर पोलिसांनी ५ मिनिटांत त्यांचा हिशेब केला असता; मात्र तेलंगाणात लांगूलचालनाच्या राजकारणामुळे पोलीस आणि काँग्रेस अन् सत्ताधारी भारत राष्ट्र समिती हे राजकीय पक्ष काहीही बोलत नाहीत’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अकबरुद्धीन यांचे प्रसारसभेत भाषण चालू असतांना पोलिसांनी त्यांना प्रचाराची वेळ संपली असल्याचे सांगत भाषण थांबवण्याची विनंती केली होती. त्यावर अकबरुद्धीन यांनी ‘अजून ५ मिनिटे शिल्लक असून मला थांबवणारा अद्याप कुणी जन्माला आलेला नाही’, अशी धमकी दिली होती.

सौजन्य इंडिया टूडे