(म्हणे) ‘रामायण आणि महाभारत शिकवून वस्त्रहरणासारख्या घटनांना सरकार प्रोत्साहन देऊ पहात आहे का ?’ – समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे विधान !

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) –  ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ (एन्.सी.ई.आर्.टी.) आणि सरकार रामायण अन् महाभारत यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करून सीता, शूर्पणखा, द्रोपदी यांसारख्या महान देवींचा अग्निपरीक्षेनंतरही करण्यात आलेला परित्याग, विवाहाच्या प्रस्तावावर नाक-कान कापणे, द्रौपदीसारख्या अन्य देवींचे वस्त्रहरण, या गोष्टींना प्रोत्साहन देऊ इच्छित आहे का ?, असा प्रश्‍न राज्यातील समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ट्वीट करून विचारला. ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने अभ्यासक्रमात रामायाण आणि महाभारत यांचा समावेश करण्याची शिफारस केल्याच्या घटनेवरून मौर्य यांनी हे ट्वीट केले आहे.

मौर्य यांनी ट्वीटमध्ये पुढे लिहिले आहे की,

१. एका भावाने दुसर्‍या भावाशी भांडण लावण्याचे काम केले, तर दुसर्‍याने भावा-भावांना आपसांत लढण्यास बाध्य केले. सरकार कौटुंबिक फुटीला प्रोत्साहन देण्याच्या बाजूने आहे का ? (स्वामी प्रसाद मौर्य समाज-समाजांत भांडण लावण्याचे काम करत आले आहेत आणि काम करत आहेत, हे त्यांच्या लक्षात येत आहे का ? असे करणार्‍यांचा शेवट काय होतो ?, हे त्यांना या ग्रंथांतून शिकायला मिळेल ! – संपादक)

२. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात जातीय हिंसा आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि महिला यांचा छळ केला जात आहे. शाळेत शुल्क न भरल्याने मुलांना मारहाण केली जात आहे. महिलांवर सामूहिक बलात्कार होत आहेत. बलात्कारानंतर हत्या करून त्यांचे तुकडे केले जात आहेत. (याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत, हे मौर्य का सांगत नाहीत ? – संपादक)

३. जर अभ्यासक्रमात पालट करायचा असेल, तर वर्तमानातील देशातील वीर पुत्र आणि राष्ट्रनायक यांचे चरित्र शिकवले पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोष, सरदार वल्लभभाई पटेल, राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंह आदी महानायकांचा समावेश केला पाहिजे. (यांचे चरित्र शिकवलेच जात आहे; मात्र श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे चरित्र शिकवले जात नाही, हे शिकवण्याचे काम आता होणार आहे. यामुळेच मौर्यांसारख्यांना पोटदुखी होऊ लागली आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • वस्त्रहरणासारखी घटना करणार्‍यांचा शेवट काय होतो ?, हे यातून शिकण्यास मिळणार आहे. शासनकर्ते कसे असावेत ? आणि कसे नसावेत ?, हे यातून शिकण्यास मिळणार आहे. एखाद्या घटनेचा चुकीचा अर्थ काढून त्यावरून अशा प्रकारचा विरोध करणारे किती अभ्यासहीन विधाने करतात, हे लक्षात येते ! अशांवर उत्तरप्रदेश सरकारने कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
  • मदरशांमध्ये काय शिकवले जाते ? तेथे शिकणारे पुढे देश आणि समाज यांसाठी काय करतात ?, यांविषयी मौर्य कधी तोंड उघडतील का ?