वारकरी संप्रदायाचा अहिल्यानगर येथे भव्य निषेध मोर्चा ; धर्मांधांवर कारवाईची मागणी

  • गुहा (अहिल्यानगर) येथील कानिफनाथ मंदिरात पुजारी आणि भक्त यांच्यावर आक्रमण झाल्याचे प्रकरण

  • हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे हटवण्याचीही मागणी

व्यासपिठावर नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देतांना वारकरी

राहुरी – सज्जनांचे संरक्षण करणे, हाच खरा वारकरी धर्म आहे. समाजकंटकाचे निर्दालन करण्यासाठी सर्व हिंदूनी संघटित होण्याची आणि जागरूक रहाण्याची आवश्यकता आहे. गुहा (अहिल्यानगर) येथील घटनेच्या प्रकरणात राज्यातील वारकरी संघटना हिंदूंच्या मागे खंबीरपणे उभी आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे राज्य सरकारने त्वरित हटवावीत. तसे न झाल्यास सविनय कायदेभंगाची चळवळ हाती घ्यावी लागेल, अशी चेतावणी महंत उद्धव महाराज मंडलीक यांनी दिली. गुहा येथील कानिफनाथ मंदिरात भक्त आणि पुजारी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायाचे वतीने आयोजित निषेध मोर्च्याचे तहसील कचेरीसमोर जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी महंत उद्धव महाराज मंडलीक बोलत होते. या मोर्च्यात शेकडो वारकरी आणि हिंदु बांधव  सहभागी झाले होते.

महंत उद्धव महाराज मंडलीक पुढे म्हणाले की, गुहा येथील ‘कानिफनाथ ट्रस्ट’ची  भूमी हडपण्याचे कारस्थान आम्ही हाणून पाडू. वारकर्‍यांना मारहाण करण्यासाठी चिथावणी देणार्‍यांना गुन्हेगार ठरवा. आपल्या मंदिरात ते घुसतातच कसे ?  कानिफनाथ मंदिरात शेकडो वर्षांपासून सप्ताह, आरती आणि भजन चालत आहे. मुसलमानांचे आक्रमण चीड आणणारे आहे. आळंदी आणि पंढरपूर कार्तिकी वारीत हे प्रश्‍न आम्ही सर्वांसमोर मांडू.

मोर्च्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वारकरी

मोर्च्यात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केलेली मनोगते

१. या वेळी श्री. अजय मांजरे म्हणाले की, गुहा येथील मंदिर कानिफनाथाचेच आहे. त्याची ४० एकर भूमी आहे. ती बळकावण्यासाठी ‘ट्रस्ट’ केला. आमचा त्यास विरोध आहे. गावात अशांतता निर्माण करणार्‍यांवर कारवाई करावी.

२. महंत अर्जुन महाराज तनपुरे म्हणाले की, वारकर्‍यांनी एकत्र आलेच पाहिजे. आपण सक्षम असले पाहिजे.

३. ह.भ.प.किशोर महाराज जाधव म्हणाले की, सर्वधर्मसमभाव हा आमचा स्थायीभाव आहे. आम्ही कुणावरही अन्याय करत नाही. आमच्यावर आक्रमण करून आम्हाला डिवचले आहे. आमच्या नादी लागू नका. नाठाळांच्या माथी काठी हाणू, हा सहस्रो वर्षांचा इतिहास आमच्या बाजूने आहे. आमचे देव पालथे घालून तुम्ही पीर उभारले. बुक्का पायदळी तुडवला. कानिफनाथाची भूमी घशात घालायची आहे. आमच्या परंपरेची अवहेलना खपवून घेणार नाही.

मोर्च्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वारकरी

४. ह.भ.प गोसावी ताई म्हणाल्या की, आम्ही महिला मागे रहाणार नाही. रक्त सांडण्याची वेळ आली, तरी आम्ही आपल्या समवेतच आहोत.

५. ह.भ.प. पांडुरंग महाराज वावीकर म्हणाले की, आमच्याकडे वाकड्या दृष्टीने पाहू नका. हिंदु समाजाने गोगल गाय बनू नये. कुणी मुजोरी केली, तर आम्ही सहन करणार नाही. आपण धर्मवीर संभाजी राजेंचे वारसदार आहोत.

६. प्रा. एस्.झेड. देशमुख म्हणाले की, आजही गोवंशहत्या होत आहे. देशविरोधी शक्तींना शक्ती देणारे मदरसे बंद केले पाहिजेत. लव्ह जिहाद प्रश्‍न गंभीर आहे.  मुसलमानांसमवेत पळून जातांना काहीच विचार का होत नाही ? वारकरी आता जागे झाले आहेत. मशिदींवरील भोंगे बंद केले पाहिजे.

नायब तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी वारकरी संप्रदायाचे निवेदन स्वीकारले !

या वेळी नायब तहसीलदार संध्या दळवी आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी वारकरी संप्रदायाचे निवेदन स्वीकारले. या मोर्च्याच्या शेवटी किरण कोळसे यांनी आभार मानले. चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या जयजयकाराने परीसर दुमदुमून गेला.