नेपाळ सरकारने मुसलमानांचा नियोजित धार्मिक कार्यक्रम ‘इज्तिमा’ केला रहित !

कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक देशांत बंदी असलेले कट्टर मुसलमान नेते आणि मौलाना येणार असल्याने घेतला निर्णय !

(‘इज्तिमा’ म्हणजे धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येणे)

काठमांडू (नेपाळ) – नेपाळ सरकारने ‘इज्तिमा’ ही मुसलमानांची वार्षिक धार्मिक सभा रहित करण्यास भाग पाडले आहे. धार्मिक संवेदनशीलतेचे कारण सांगत गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सरकारने या सभेसाठी उभारण्यात आलेले तंबू आणि अन्य गोष्टी २४ घंट्यांमध्ये हटवण्याचा आणि येथे पोचलेल्या मुसलमानांना परत जाण्याचा आदेश दिला आहे. जिल्हा प्रशासनला माहिती मिळाली होती, या कार्यक्रमाच्या नावाखाली काही कट्टर मुसलमान धार्मिक नेते आणि मौलाना येणार होते, ज्यांना भारतासह अनेक देशांनी त्यांच्या देशात येण्यास बंदी घातलेली आहे.

१. नेपाळच्या पूर्व भागातील सुनसरी जिल्ह्यातील दुहबी आणि इटहरी या भागांत २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अनुमाने ८० एकर भूमीवर तंबू उभारण्यात आले होते. या सभेसाठी ५० सहस्र लोक उपस्थित रहाणार होते. त्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. जगभरातील अनेक इस्लामी देशांतून लोकांना बोलावण्यात आले होते.

२. धार्मिक स्तरावर संवेदनशील असणार्‍या सुनसरी जिल्ह्यामध्ये मुसलमानांच्या मोठ्या आयोजनामुळे केवळ नेपाळच नव्हे, तर भारतीय सीमेवरही धार्मिक भावना भडकण्याच्या शक्यतेमुळे हा कार्यक्रम रहित करण्यात आला.

३. सुनसरीच्या जिल्हाधिकारी हुमकला पांडे यांनी सांगितले की, मुसलमानांच्या या धार्मिक कार्यक्रमानिमित्त गृहमंत्रालयाला पत्र पाठवून येणार्‍या आव्हानांविषयी सांगत सल्ला मागितला होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहून त्यांनी हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थित होऊ न देण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही कार्यक्रम रहित करण्यास आयोजकांना सांगितले.

संपादकीय भूमिका

‘नेपाळ सरकारचा अभिनंदनीय निर्णय !’ असेच म्हणावे लागेल ! बहुसंख्यांक हिंदु असलेल्या आणि पूर्वी जगात एकमेव हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळने असा निर्णय घेणे सध्याच्या स्थितीत कौतुकास्पदच म्हणावे लागेल !