कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी परीक्षार्थी विवाहितांना मंगळसूत्र काढण्यास भाग पाडले !

  • कानातले, सोनसाखळी आणि जोडवी काढण्यास लावली !

  • हिजाब घातलेल्या तरुणींना मात्र सूट !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ५ नोव्हेंबरला आलेल्या विवाहित तरुणींना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे मंगळसूत्र काढण्यास सांगण्यात आले. याखेरीज कानातले, गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या आणि पायातील जोडवीही काढायला सांगण्यात आली. मंगळसूत्र काढण्यास नकार देणार्‍या महिलांना परीक्षेला बसण्यास अधिकार्‍यांनी नकार दिला. एवढेच नव्हे, तर कानातील आभूषणे काढता न आल्याने महिलांना सोनाराकडे जाऊन काढून घ्यावे लागले. रायचुरच्या २ महिलांची अधिकार्‍यांनी कडक तपासणी करून मंगळसूत्र आणि जोडवी काढायला लावली, तेव्हा महिलांना नातेवाइकांकडे जाऊन दागिने ठेवून परीक्षा केंद्रात यावे लागले. परीक्षेच्या वेळी होणारी कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भातील वृत्त वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्यानंतर अधिकार्‍यांनी दागिने न काढण्याविषयी संबंधितांना आदेश दिला.

१. परीक्षेला आलेल्या तरुणींनी सांगितले की, हिंदु धर्मात मंगळसूत्र काढले जात नाही. जेव्हा आवश्यक असेल, तेव्हाच आम्ही ते काढून ठेवतो. परीक्षा देण्यासाठी मला मंगळसूत्र आणि पायातली जोडवी काढावी लागली. ज्याप्रमाणे अधिकार्‍यांनी हिजाब घातलेल्या तरुणींना तपासल्यानंतर आत जाऊ दिले, त्याचप्रमाणे आम्हालाही आत जाण्याची अनुमती द्यायला हवी होती.

२. या घटनेच्या एक दिवस आधी कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेच्या वेळी कॉपी केल्याप्रकरणी एक उमेदवाराला आणि त्याचा भाऊ यांना अटक करण्यात आली होती. त्रिमूर्ती आणि अंबरीश अशी दोघांची नावे आहेत. त्रिमूर्ती परीक्षा केंद्रात ब्ल्यू टूथ उपकरण बसवून परीक्षा देत होता. त्याचा भाऊ अंबरिश त्याला परीक्षा केंद्राबाहेरून ब्ल्यू टूथद्वारे साहाय्य करत होता.

असा नियम केवळ हिंदूंसाठीच आहे का ? – भाजप

हिजाब घालून आलेल्या तरुणीला प्रवेश देण्यात आला. त्यामुळे ‘हा नियम केवळ हिंदूंसाठीच आहे का ?’, असा प्रश्‍न भाजपचे खासदार बसनगौडा यत्नल यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

  • कॉपी रोखण्याच्या नावाखाली असा तुघलकी प्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तर इतरांवर त्याचा वचक बसेल !
  • काँग्रेसच्या राज्यात मुसलमानांना सूट, तर हिंदूंना कायद्याचा बडगा, असाच प्रकार चालू आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंच्या हे आता लक्षात येत आहे का ?