भारत देशात समान नागरी कायदा येईल !

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन !

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (जि. बेळगाव) – कोरोना विषाणू मी नष्ट केला आहे, तसेच भारतात समान नागरी कायदा येईल आणि गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील, असे आशीर्वचन श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाने भक्तांना भाकणुकीत दिले. याचसमवेत ‘जगाला तापमानवाढीचा धोका भेडसावेल, जंगलांना आग लागून वन्यजीव-वन्य औषधे पृथ्वीवरून नष्ट होतील’, असे सांगून येणार्‍या आपत्काळाविषयीही सूचित केले. ही भाकणूक ३१ ऑक्टोबरच्या पहाटे ३.४५ वाजता पू. सिद्धार्थ (पू. भगवान डोणे महाराज यांचे चिरंजीव) डोणे महाराज (वाघापुरे) यांच्या माध्यमातून सांगण्यात आली.

या भाकणुकीत हालसिद्धनाथाच्या मंदिराच्या बांधकामाला ३३ कोटी देवांचा आशीर्वाद आहे; खडकाचा राजदरबार बघायला जगदुनिया येईल; धावण्याला धावीन- नवसाला पावीन, पावत राहीन; मूग-तूर, सोयाबीन कडधान्य उदंड पिकेल, सर्वसामान्य माणसाला पुरावा करल (पुरेल); डाळीचा भाव तेजीत राहील; साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील; महाराष्ट्र राज्यामध्ये नदीजोड प्रकल्प येईल; दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल, नंदनवन होईल; पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल; भगवा झेंडा राज्य करील; शत्रूराष्ट्र चीन भारतावर आक्रमण करील, यांसह अनेक गोष्टींविषयी भाकिते वर्तवण्यात आली आहेत.