भारताने पाक आणि चीन सीमेवर तैनात केली ‘एस्-४००’ या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा !

‘एस्-४००’ क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा

नवी देहली – भारताने चीन आणि पाकिस्तान सीमेवर ‘एस्-४००’ ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. २ यंत्रणा चीन सीमेवर, तर १ यंत्रणा पाक सीमेवर तैनात करण्यात आली आहे. ही यंत्रणा भारताने रशियाकडून विकत घेतली आहे.

भारताने रशियाकडून एकूण ५ ‘एस्-४००’ क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा विकत घेण्याचा करार केला आहे. ३५ सहस्र कोटी रुपये मूल्याची ही यंत्रणा आहे. अद्याप रशियाकडून २ यंत्रणा मिळणे शेष आहे. ‘एस-४००’ ही यंत्रणा ४०० किलोमीटर दूर अंतरावरून येणारे क्षेपणास्त्र, रॉकेट, ड्रोन अथवा लढाऊ विमान यांना आधीच ओळखून त्यांच्यावर प्रहार करते. ही यंत्रणा उणे ५० डिग्री सेल्सियस ते ७० डिग्री सेल्सियसच्या वातावरणातही काम करू शकते. रशिया युक्रेनसमवेतच्या युद्धात या यंत्रणेचा वापर करत आहे.