गाव उद्ध्वस्त करणारा खाण व्यवसाय नको ! – अडवलपालवासियांची मागणी

अडवलपालवासियांची मागणी

डिचोली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – १५ वर्षांपूर्वी तत्कालीन खाण आस्थापनाकडून स्थानिक लोकांच्या विरोधात प्रविष्ट केलेले खटले प्रथम मागे घ्यावेत. स्थानिक आमदार आणि संबंधित शासकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन ग्रामस्थांचे प्रश्न अगोदर सोडवावेत आणि नंतरच खाण ब्लॉक-५ अंतर्गत खाण चालू करण्यास ‘ना हरकत दाखला’ देण्यासंबंधी विचार व्हावा, असा सूर तालुक्यातील अडवलपाल पंचायतीच्या ग्रामसभेतून उमटला. २९ ऑक्टोबर या दिवशी सरपंच गजानन पालकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत काही ग्रामस्थांनी ‘गाव उद्ध्वस्त करणारा खाण व्यवसाय नको’, अशी भूमिका मांडली.