कॅनडाने भारताच्या आदेशानंतर त्याच्या ४१ अधिकार्‍यांना माघारी बोलावले !

आम्ही प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार नसल्याचा कॅनडाचा दावा

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली

ओटावा (कॅनडा) – भारताने कॅनडाला भारतातील त्याच्या दूतावासातील ६२ पैकी ४१ अधिकार्‍यांना माघारी बोलावण्यास काही आठवड्यांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार कॅनडाने अधिकृतपणे या अधिकार्‍यांना माघारी बोलावले आहे. भारताने या अधिकार्‍यांनी देश सोडावा म्हणून १० ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती; मात्र कॅनडा आणि भारत यांच्यात चर्चा चालू होती. त्यामुळे काही तरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा होती; मात्र ही चर्चा अपयशी ठरली. खालिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप भारतावर केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने ही मागणी केली होती. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी अधिकार्‍यांना माघारी बोलावण्याची माहिती दिली. त्यांनी हेही म्हटले की, कॅनडा प्रत्युत्तरादाखल कोणतही कारवाई करणार नाही.

कॅनडातल्या एका माजी अधिकार्‍याने म्हटले आहे की, भारताने कॅनडाच्या  अधिकार्‍यांना देश सोडायला सांगणे, ही काही सर्वसामान्य घटना नाही. अशी घटना मागच्या ४० ते ५० वर्षांत घडल्या नव्हत्या.

संपादकीय भूमिका

कॅनडा कोणत्या सूत्रांच्या आधारावर प्रत्युत्तरादाखल भारतावर कारवाई करणार ? चूक कॅनडाने केली असल्याने कॅनडाने आता त्याच्या देशात रहात असलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताकडे सुपुर्द करावे !