श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या श्री त्रिपुरसुंदरीदेवीच्या यागाच्या माध्यमातून त्यांनी ‘पंचतत्त्वांना प्रसन्न करून घेतले’, याविषयी आलेली अनुभूती

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘आपत्काळाच्या दृष्टीने साधकांमध्ये आध्यात्मिक बळ निर्माण व्हावे’, या हेतूने श्री त्रिपुरसुंदरीदेवीचा याग करण्यात आला. यज्ञस्थळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती. या वेळी आलेली अनुभूती येथे देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा  सिंगबाळ
सुश्री (कु.) कल्याणी गांगण

१. यज्ञस्थळी साधिकेने देवीला प्रार्थना केल्यावर ‘काही वाईट शक्ती पळून जात आहेत, तर काही नष्ट होत आहेत’, याची अनुभूती येणे

‘यागातून चैतन्य मिळावे’, यासाठी मी यज्ञस्थळी बसले होते. मी श्री त्रिपुरसुंदरीदेवीला प्रार्थना केली, ‘हे देवी, मला त्रास देणार्‍या वाईट शक्तींना तू नष्ट कर.’ त्या वेळी ‘मला त्रास देणार्‍या काही वाईट शक्ती पळून जात आहेत, तर काही वाईट शक्तींना देवीने नष्ट केले आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. त्यानंतर मला हलके वाटून माझा नामजप आणि प्रार्थना होऊ लागल्या.

२. देवीला प्रार्थना केल्यावर ‘यज्ञ पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांत होत आहे’, असे दिसणे अन् त्या वेळी मनाला पुष्कळ आनंद होणे

अ. आरंभी मला ‘यज्ञ पृथ्वीवर चालू आहे’, असे दिसले. याग चालू असतांना मी देवीला प्रार्थना केली, ‘हे देवी, माझ्यातील स्वभावदोष न्यून होऊ देत.’ तेव्हा एका क्षणात ‘यज्ञकुंड, यज्ञकुंडाचा परिसर, पुरोहित साधक आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ हे सर्व जण पाण्यात आहेत अन् हा यज्ञ पाण्यात चालू आहे, म्हणजे ‘यज्ञ आपतत्त्वात चालू आहे’, असे मला दिसले. ‘देवीच्या कृपेने आपतत्त्वाचा आशीर्वाद मिळाला आहे’, असे मला जाणवले.

आ. त्यानंतर मला यज्ञाच्या ठिकाणी सर्वत्र धूर दिसू लागला. हा धूर म्हणजे वायुतत्त्व असल्याने ‘यज्ञ हवेत चालू आहे’, असे मला जाणवले.

इ. नंतर मला यज्ञाच्या ठिकाणी सर्वत्र प्रकाश दिसू लागला आणि ‘यज्ञाचे तेज सर्वत्र पसरले आहे’, असे जाणवले. तेव्हा मला ‘यज्ञ तेजतत्त्वाच्या ठिकाणी चालू आहे’, असे वाटले. ही सर्व दृश्ये दिसत असतांना माझ्या मनाला पुष्कळ आनंद मिळत होता.

३. नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण होण्यासाठी ‘यज्ञाच्या माध्यमातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पंचतत्त्वांना प्रसन्न करून घेतले’, असे जाणवणे

दुसर्‍या दिवशी गुरुवार होता आणि मी भाववृद्धीसत्संग ऐकत होते. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांमुळे पुढे पृथ्वीवर येणारी नैसर्गिक आपत्ती भयानक असणार आहे. पंचतत्त्वांना प्रसन्न करून घेतल्यामुळे देव साधकांचे रक्षण करणार आहे.’’ तेव्हा आदल्या दिवशी झालेल्या यज्ञामुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पंचतत्त्वांना प्रसन्न करून घेतले आहे’, असे मला जाणवले.’

– कु. कल्याणी गांगण (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०२१)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.