श्राद्धाच्‍या जेवणामागील अध्‍यात्‍मशास्‍त्र

‘ब्राह्मणाने जेवलेले अन्‍न पितरांना कसे पोचते ?’, ‘श्राद्धात दिलेले अन्‍न पितरांना किती काळ पुरते ?’, अशांसारख्‍या अभ्‍यासपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे आणि यांमागील धर्मशास्‍त्र काय आहे, हे येथे देत आहोत.

१. ब्राह्मणभोजन

१ अ. ब्राह्मणाने जेवलेले अन्‍न पितरांना कसे पोचते ?

१. ‘श्राद्धादी कर्मात उच्‍चारलेल्‍या मंत्राच्‍या नादाच्‍या परिणामाने ब्राह्मणाच्‍या देहातील ब्राह्मतेज जागृत होते. तसेच पितरांना आवाहन करून विश्‍वेदेवांच्‍या अधिष्‍ठानाने त्‍या त्‍या अन्‍नोदकावर मंत्राने भारित पाणी शिंपडल्‍याने हविर्भाग म्‍हणून अर्पण केलेल्‍या अन्‍नातून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म-वायू पितरलहरींना मिळण्‍यास साहाय्‍य होते.

२. पितरांच्‍या नावाने ब्राह्मतेज जागृत झालेला ब्राह्मण जेवायला घालण्‍याचे पुण्‍यही श्राद्धकर्त्‍याला, तसेच पितरांना मिळते. यातून ब्राह्मणाचेही आशीर्वाद पितरांच्‍या गतीला वेग मिळण्‍यास कारणीभूत होतात.

३. बाह्यतः पितरांच्‍या नावे ब्राह्मणांना जेवू घालणे, या ‘कर्तव्‍यपूर्तीसाठी कृती’ अशा दृष्‍टीकोनापेक्षा ‘ब्राह्मणांच्‍या माध्‍यमातून प्रत्‍यक्ष पितरच जेवत आहेत’, असा भाव ठेवणे अधिक महत्त्वाचे असल्‍याने संतुष्‍टयुक्‍त ब्राह्मणाच्‍या देहातून प्रक्षेपित होणार्‍या आशीर्वादात्‍मक सात्त्विक लहरींचे बळ पितरांना प्राप्‍त होते. या अर्थी ‘ब्राह्मणांनी जेवलेले अन्‍न पितरांना मिळते’, असे म्‍हटले आहे.

२. श्राद्धकर्म करतांना पितरांचे नाव आणि गोत्र यांच्‍या केवळ उच्‍चारानेच त्‍यांना श्राद्धातील हव्‍य कसे मिळते ?

‘अध्‍यात्‍मातील मूळ निर्गुणाचा नियम आहे, ‘जिथे शब्‍द आहे, तिथे शक्‍ती, स्‍पर्श, रूप, रस आणि गंधही आहे’. साकारता ही पंचतत्त्वांच्‍या आधारे लहरींचे घनीकरण करून आपल्‍यासमोर सगुण रूपात, म्‍हणजेच मूर्त स्‍वरूपात उभी रहाते. प्रत्‍येक गोष्‍ट ही शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस आणि गंध या वैशिष्‍ट्यांसहित पंचतत्त्वांच्‍या साहाय्‍याने बनलेली आहे. श्राद्धकर्मात केवळ पितरांच्‍या नावांच्‍या उच्‍चारणाने प्रक्षेपित झालेली वायूमंडलातील शब्‍दकंपने मंत्रांच्‍या साहाय्‍याने प्रवाही बनून, त्‍या त्‍या स्‍तरावर वायूमंडलात भटकणार्‍या लिंगदेहाला साध्‍य बनवून, त्‍याच्‍या वासनामय कोषाला भेदून त्‍याला श्राद्धाच्‍या ठिकाणी आकर्षित करतात. यामुळे त्‍या त्‍या गोत्राचे पितर त्‍या त्‍या ठिकाणी मंत्रशक्‍तीने ओढले जाऊन श्राद्धातील हव्‍य ग्रहण करून तृप्‍त होतात. मंत्रशक्‍तीमुळे त्‍या त्‍या पितरांच्‍या नावांच्‍या शब्‍दांतून प्रक्षेपित होणार्‍या ध्‍वनीकंपनांना गती प्राप्‍त झाल्‍याने, ती आपला सूक्ष्म परिणाम वायूमंडलावर सोडतात आणि सूक्ष्म स्‍तरावर वायू किंवा स्‍पर्श रूपे पितरांना हव्‍य ग्रहण करण्‍यास भाग पाडतात.’

– (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिखाण करायच्‍या, १२.८.२००५, सायं. ५.४६)

३. श्राद्धात दिलेले अन्‍न पितरांना किती काळ पुरते ?

‘श्राद्धाच्‍या अन्‍नातून मंत्रोच्‍चाराच्‍या स्‍पर्शाने प्रक्षेपित होणार्‍या तेजोस्‍वरूपी सूक्ष्म-वायूच्‍या स्‍पर्शाने लिंगदेहातील वासनामयकोषातील रज-तम कणांचे उच्‍चाटन होण्‍यास साहाय्‍य होते. लिंगदेहाचे जडत्‍व काही प्रमाणात अल्‍प झाल्‍याने त्‍याला हलकेपणा जाणवून तो पुढची गती धारण करतो. हा महत्त्वाचा उद्देश अन्‍नातून साध्‍य झाल्‍याने ‘श्राद्धात दिलेले अन्‍न पितरांना किती काळ पुरते ?’, या प्रश्‍नाला अर्थ उरत नाही, तर ती एक क्षणिक काळाची लिंगदेहातील अन्‍नाशी संबंधित संस्‍कारात्‍मक रज-तम कणांचे श्राद्धातील तेजोमय लहरींच्‍या साहाय्‍याने विघटन करण्‍याची सूक्ष्म-प्रक्रिया असल्‍याचे लक्षात येते.’

– (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिखाण करायच्‍या, १३.८.२००६, दुपारी १२.२१)

४. श्राद्धाचे भोजन करणार्‍याने स्‍वाध्‍याय (मायेतील विचार), कलह इत्‍यादी कृत्‍ये का करू नयेत ?

‘श्राद्धाचे भोजन हा अशुभ कर्मविधी मानला आहे. श्राद्धकर्मातील भोजन हे पितरांच्‍या नावे केलेल्‍या आवाहनात्‍मक मंत्रांच्‍या उच्‍चारणाने भारित झालेले असल्‍याने, ते वासनात्‍मक म्‍हणजेच रज-तमात्‍मक असते. या व्‍यतिरिक्‍त लिंगदेहांच्‍या आगमनाने वातावरणही दूषित झालेले असते. यामुळे श्राद्धाचे जेवण ग्रहण करणार्‍या जिवाला त्रास होण्‍याची शक्‍यता अधिक असते; म्‍हणून असे रज-तमात्‍मक जेवण ग्रहण करायला जाण्‍यापूर्वी कर्मकांडाने काही बंधने घातली आहेत. ती बंधने पाळून आपल्‍या देहावर वरील रज-तमात्‍मक विधीतून निर्माण होणारा परिणाम न्‍यूनतम होऊ देणे आणि त्‍याचा आपल्‍याला त्रास होऊ न देणे, हा यामागे दडलेला हिंदु धर्माचा उद्देश आहे.

४ अ. स्‍वाध्‍याय (मायेतील विचार)

स्‍वाध्‍याय म्‍हणजे आपण केलेल्‍या कृतीचे चिंतन करणे. चिंतन हे विचारांपेक्षा (मननापेक्षा) सूक्ष्म स्‍तरावर असल्‍याने ते जिवाच्‍या देहात त्‍या त्‍या वृत्तीचा सखोल संस्‍कार करते. सर्वसामान्‍य जीव रजतमात्‍मक मायेतील आसक्‍तीदर्शक कृत्‍यांचेच अधिक प्रमाणात सखोल चिंतन करत असल्‍याने, त्‍याच्‍या भोवती रज-तमात्‍मक लहरींचे वायूमंडल बनते. या संस्‍कारांनिशी आपण भोजन ग्रहण करण्‍यास गेल्‍याने, तेथील रज-तमाचा आपल्‍या देहावर आणखी परिणाम होऊन त्रास होण्‍याची शक्‍यता वाढते.

एखाद्या जिवाने सात्त्विक लहरींच्‍या स्‍तरावर साधनेचा चिंतनात्‍मक स्‍वाध्‍याय साधला असेल, तरीही श्राद्धातील रज-तमात्‍मक जेवण ग्रहण करून त्‍याच्‍या शरिरातील सत्त्वगुण अल्‍प होऊ शकतो; म्‍हणून दोन्‍हीही दृष्‍टीने स्‍वाध्‍याय करून जेवणे हे अल्‍प लाभदायक ठरते.

४ आ. कलह : कलहाने मनोमयकोषातील रज-तमाचे प्रमाण वाढते.

४ इ. दिवसा झोप : झोप तमप्रधान असल्‍याने ही आपल्‍यात तमाचे, म्‍हणजेच चिडचिडेपणाचे संवर्धन करते.

४ ई. त्‍याच दिवशी दुसर्‍यांदा जेवणे : दुसर्‍यांदा जेवण केल्‍याने श्राद्धातील रजतमात्‍मक जेवणातून उत्‍पन्‍न झालेला सूक्ष्म-वायू हा आपल्‍या देहात संचारित अवस्‍थेत असल्‍याने, या सूक्ष्म-वायूच्‍याच साहाय्‍याने दुसर्‍या जेवणातील अन्‍नाचे पचन झाल्‍याने ते अन्‍न आपल्‍याला बाधक ठरू शकते; म्‍हणून वरील सर्व कृती टाळून मगच श्राद्धाचे जेवण घ्‍यावे, असे धर्माने सांगितले आहे.’

– (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिखाण करायच्‍या, ४.८.२००५, दुपारी ३.५४) 

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.