(म्हणे) ‘सनातन धर्मावर बोलल्यामुळे एका मुलाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे !’ – अभिनेते कमल हासन

अभिनेते कमल हासन यांच्याकडून उदयनिधी यांचा बचाव !

अभिनेते कमल हासन आणि उदयनिधी स्टॅलिन

चेन्नई (तमिळनाडू) – एका मुलाला विनाकारण लक्ष्य केले जात आहे; कारण त्याने सनातन धर्माविषयी केवळ विधान केले. त्याच्या पूर्वजांनीही सनातन धर्मावर विधाने केली होती. द्रमुकचे (द्रविड मुन्नेत्र कळघम्चे – द्रविड प्रगती संघाचे) संस्थापक पेरियार यांनीही सनातन धर्माविषयी विचार मांडले होते, अशा शब्दांत अभिनेते कमल हासन यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी यांचा बचाव केला. उदयनिधी सातत्याने सनातन धर्माला संपवण्याविषयी विधान करत आहेत. (पूर्वीही सनातन धर्माच्या विरोधात बोलणार्‍यांचा हिंदूंनी उणे-अधिक प्रमाणात विरोध केलाच आहे आणि आताही कुणी बोलत असेल, तर वैध मार्गाने विरोध केला जाईलच ! – संपादक)

कमल हासन पुढे म्हणाले की,

१. पेरियर एकेकाळी वाराणसीमधील एका मंदिरात रहात होते आणि तेथे पूजा-अर्चा करत होते. ते कपाळावर टिळाही लावत होते. त्यांनी नंतर या सर्वांचा त्याग केला. यावरून त्यांच्यामध्ये सनातन धर्माविषयी किती राग होता हे लक्षात येईल. (पेरियार यांनी काही लोकांच्या अयोग्य कृतीवरून संपूर्ण सनातन धर्माला अयोग्य ठरवून या गोष्टींचा त्याग केला, असेच त्यांच्या जीवनावरून लक्षात येते ! यातून त्यांनी धर्माचा अभ्यासच केला नाही आणि त्यांना सनातन धर्माची महानताच समजली नाही, हेच लक्षात येते ! – संपादक)

२. लोकांची सेवा करणे, हीच सर्वांत मोठी सेवा आहे, याची पेरियार यांना जाणीव झाली. जीवनाच्या अंतापर्यंत ते समाजासाठीच जगले. (पेरियार समाजासाठी जगतांना समाजांमध्ये वैचारिक द्वेष पसरवत राहिले, हेही तितेकच खरे आहे ! – संपादक)

३. पेरियार यांच्यावर द्रमुक किंवा अन्य कोणताही राजकीय पक्ष दावा करू शकत नाही; कारण पेरियार यांना संपूर्ण तमिळनाडूमध्ये मानले जाते. (संपूर्ण तमिळनाडूमध्ये नाही, तर सनातन धर्माचा द्वेष करणार्‍यांमध्ये त्यांना मानले जाते, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • उदयनिधी यांनी जाणीवपूर्वक सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे, याकडे कमल हासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत !
  • जर कुणी द्रमुकला, तसेच पेरियार यांचे विचार संपवण्याचे विधान केले, तर कमल हासन, उदयनिधी आदी लोक ते शांतपणे स्वीकारतील का ?