अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे एकूण ५ अधिकारी आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

  • अद्यापही चकमक चालू !

  • डोंगरात लपले आहेत २-३ आतंकवादी !

कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष धोनचक, पोलीस उपायुक्त हुमायू भट आणि २ सैनिक वीरगतीला प्राप्त

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथे जिहादी आतंकवाद्यांसमवेत गेल्या २ दिवसांपासून चालू असणार्‍या चकमकीमध्ये कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष धोनचक, पोलीस उपायुक्त हुमायू भट आणि २ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले असले, तरी अद्याप येथील डोंगरांवर २-३ आतंकवादी लपले असून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न सैन्याकडून केला जात आहे. लष्कर-ए-तोयबाशी निगडीत प्रतिबंधित संघटना ‘रेझिस्टन्स फ्रंट’ने या आक्रमणाचे दायित्व घेतले आहे. अधिकार्‍यांच्या मते; हे तेच आतंकवादी आहेत, ज्यांच्यासमवेत ४ ऑगस्ट या दिवशी कुलगामच्या जंगलात झालेल्या चकमकीत ३ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते.

 (सौजन्य : News18 Rajasthan)

काश्मीरमध्ये गेल्या ३ वर्षांतील हे सर्वांत मोठे आक्रमण आहे. यापूर्वी ३० मार्च २०२० या दिवशी काश्मीरमधील हंदवाडा येथे १८ घंटे चाललेल्या चकमकीमध्ये कर्नल, मेजर आणि उपनिरीक्षकासह ५ अधिकारी वीरगतीला प्राप्त झाले होते. या वर्षी जानेवारीपासून जम्मू-काश्मीरमध्ये ४० आतंकवादी मारले गेले आहेत. त्यांपैकी केवळ ८ स्थानिक होते आणि उर्वरित सर्व परदेशी होते.

संपादकीय भूमिका

काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार केले जाते, तरीही तेथील आतंकवाद समूळ नष्ट झालेला नाही. त्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करणे आवश्यक आहे. तसेच काश्मीरमधील जिहादी मानसिकता असणार्‍यांवर लगाम घालणे आवश्यक आहे !